Thursday, December 24, 2015

सिंहगडची अत्युच्च अनुभूती



शुक्रवारच्या रात्री जास्त झाली नसेल तर शनिवारी सकाळी सिंहगड चढायचंच ह्या उद्देशाने तु पहाटे उठू शकशील. पहाटे साडेचार वाजता उठल्यावरविवाहित असशील तर बायकोला, लिव्ह इन मध्ये असशील तर जोडीदाराला आणि नशीबवान असशील तर गर्लफ्रेंडला उठवायचा प्रयत्न कर. त्यांच्याकडून तुला पहाटे पहाटे अनपेक्षितपणे नाहीत्याच कामासाठी झोपमोड केली म्हणून शिव्या बसतील. अगदीच दुर्दैवाने पछाडलेला असशील आणि मित्राबरोबर राहत असशील तर रूम पार्टनरला उठवायचा प्रयत्न कर, तो तुला "भंजाळला काय येड्झव्या, एवढ्या थंडीचं कुठे आयघालतो, झोप उगं" असे म्हणून पुन्हा गोदडीत घुसायला प्रोत्साहित करील. पण तू त्याच्या प्रोत्साहनाकडे दुर्लक्ष करून रिकामं होऊन ये. गेले पंधरा दिवस ऑफिसला/कॉलेजला  जाताना वापरत असलेले वास मारके सॉक्स फेकून देऊन दुसरे धुतलेले सॉक्स घाल, बूट चढव आणि बाईकला किक मारून सिंहगड रोडच्या दिशेने निवांत पहाटेच्या चांदण्यांची मजा घेत सावकाश गाडी चालवू लाग. अगोदर तो मोबाइल फेकून दे नाहीतर कानाला हेड फोन लावून पहाटेच्या शांत आणि निसर्गातील संगीताला फुकट मुकशील. जरा पुण्याच्या बाहेर पडले कि तुला हेल्मेट काढून त्या स्वछ, खुल्या आणि थोड्याशा बोचणाऱ्या हवेला तोंडावर घेऊ वाटेल. बिन्दास्त हेल्मेट काढ, दोन मांड्याच्या मध्ये ठेव आणि चेहऱ्यावर थंड हवा घेत सावकाश पुढे जात रहा. डोळ्यांना, गालांना, गळ्याला, केसातून आत जाउन अगदी डोक्याला सुद्धा त्या थंड आणि वर्जिन हवेचा स्पर्श तुला नक्कीच स्वर्ग सुख देईल.

काही आनंदी क्षणातच खडकवासला धरण लागेल. इथे अजून पर्यटकांची गर्दी झालेली नसेल. त्यामुळे वडापाव, चहा, भेळबुट्टा (मक्याच्या कणसाला मराठी शब्द) विकणारे लोक पण नसतील आणि लोकांना पाण्यात उतरू नका, पर्यावरणाचे रक्षण करा वैगेरे वैगेरे ज्ञान देणारे स्वयंभू समाजसेवक पण नसतील.

तिथे तांबडं फुटायच्या अगोदरचा संधीप्रकाश, त्या तलावाच्या आतून कुठून तरी किनारा शोधत येऊन स्वतःचे अस्तित्व त्याच किनाऱ्यावर संपवून घेणाऱ्या नाजूक लाटा, त्या तरंगणाऱ्या नाजूक लाटावरील वातावरणात व्यापलेले आणि स्वत:चे अस्तित्व संपवणाऱ्या प्रकाशाची वाट बघत असलेले धुके तुझे लक्ष वेधून घेईल. डावीकडे असलेले जंगल खुणावेल आणि उजवीकडे तळ्यात कुठेतरी दूर असलेली बोट तुला आवाज देईल.

 "ये विचित्र मानसाजरा थांब इथे, त्या तळ्याच्या पाण्यात अर्धं बुडून आणि अर्धं बाहेर राहून आपले अस्तित्व दाखवणाऱ्या खडकावर जरा बुड टेक. पाण्यात पाय सोडून बसलास तरी चालेल. सुरुवातीला पाणी थंड वाटेल पण नंतर तुला पाण्यात गरम आणि बाहेर जास्त थंडी वाटेल. आता पाण्यातून पाय बाहेर काढू वाटणार नाहीत. थोडा वेळ ह्या तलावावरील थंड हवेचा, धुक्याचा आणि त्या हळुवार नाजूक आवाज करणाऱ्या पाण्याच्या लाटांच्या संगीताचा अनुभव घे. किती वेळ गेला हे तुला समजणार नाही. डोंगरा पलीकडून येणारी सूर्यकिरणे ह्या धुक्याला खाउन टाकतील.  तेंव्हा मी  तुला स्पष्ट दिसू लागेल आणि तू माझ्यावर आणि त्या संपूर्ण दृशावर प्रेम करू लागशील. तू मला अगदीच रसिक दिसत आहेस. मला हाकणाऱ्या या अरसिक सैनिकांच्यात राहून कंटाळा आला आहे. मला माहित आहे तू माझ्याजवळ येऊ शकणार नाहीस, पण त्या सूर्याच्या उगवणाऱ्या सोनेरी किरणात मी ह्या तलावावर तरंगत असताना तू दुरून एखादा सुंदर फोटो तरी काढशील.

"पहाटेच्या सूर्याच्या सोनेरी प्रकाशात, अंधुक धुक्यात दूरवर पाण्यावर तरंगणारी शिडाची बोट "

हा सुंदर फोटो तुला भेटेल आणि ते सौंदर्य अनेक लोकांकडून नावाजले जाइल. त्यातंच मी माझे सुख मानेल. नाहीतर जवळ आला तर माझ्यातील घाण तुला दिसेल आणि तू माझा तिरस्कार सुद्धा करू शकशील. त्यामुळे तू थांब,  दूरच रहा. दूर राहिला तरच आपले प्रेम कायम राहील. चिरकाल. "

तळ्यातील बोटेतून येणाऱ्या ह्या सादेला कसा प्रतिसाद द्यायचा ते तू ठरव. शौर्याची गाथा सांगणाऱ्या आणि आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या सिंहगडला लवकर गाठायचे कि ह्या निसर्गातील प्रत्येक आवाजांना आणि आवाहनांना प्रतिसाद देत देत पुढे जायचे हे तुला ठरवावेच लागेल . कारण तुला तुझ्या वाटेवर अनेक ठिकाणी असे आवाज ऐकू येतील, अशी आवाहने केली जातील. प्रत्येक ठिकाणी मोह होतील, पण तुझा वेळ कुठे, कुणाला आणि किती द्यायचा हे तू ठरवले असेल तर तुला जास्त अडचणी येणार नाहीत.

सिंहगड खुणावतोय? तो उगवतानाचा सुर्य, सिंहगडाच्या अर्ध्या चढाईवरील कड्यावरून पहाचाय? मग तसेच पुढे जात रहा. तलावात्तील बोटीच्या आर्त सादेला प्रतिसाद नंतर कधीतरी देता येईल.

आजून काही काळ मोटारसायकल चालवल्या नंतर पुढे तुला अतिशय उत्साही सायकलस्वार  दिसतील. गैरसमज करून घेऊन नकोस. ते सकाळी सकाळी उठून बाजारला चाललेले, काहीतरी विकायला चाललेले किंवा कामानिमित्त चाललेले कष्टाळू लोक नसतील. ते विकेंडला वजन कमी करण्यासाठी चाललेले तरुण तरुणी असतील. त्यांच्या सायकली इम्पोर्टेड असतील, सायकलच्या खालच्या नळीला पाण्याची बाटली लावलेली असेल. जरा जवळ गेल्यानंतर तुला कळेल त्यात खूपच  सुंदर अशा दोन मुली पण आहेत. त्यांना डोळ्यात साठवून ठेव. परत घरी गेल्या नंतर बायकोला सांगायला बरे पडेल, ”शिक काही तरी त्या मुलींकडून, पहाटे पहाटे सायकलवर सिंहगड चढायला चालल्या होत्या, हाफ चड्डी घालून सुद्धा त्यांना थंडी वाजत नव्हती, याला म्हणायचे डेडीकेशन, नाहीतर तू आठ वाजे पर्यंत अंथरुणातून बाहेर येत नाहीस”  

हा असला डायलॉग तुझ्या तोंडातून बायकोला अंडर इस्टीमेट केल्याने बाहेर पडला हे बायकोच्या उत्तरावरून वरून तुझ्या लगेच लक्षात येईल. ती जेव्हा म्हणेल, “ठीक आहे मला पण हाफ चड्डी घेऊन दे आणि सायकल घेऊन दे, मी पण जाते हाफ चड्डी घालून सिंहगडला. सिंहगडलाच काय अगदी राजगडला पण जाते”  हा काळ खूप कठीण असेल. अशी संकटे तुला वोढवून घ्यायची सवयच आहे, हे तुझ्या लक्षात येईल. अशा वेळी तू काहीच न बोलता टीव्हीचा च्यानेल बदल. काही काळानंतर संकट आले तसे आपोआप गायब पण होईल.

हां,  तर त्या सुंदर सायकलस्वारांना पाठीमागे सोडून ते पुन्हा सिंहगडावर भेटतील या आशेने पुढे जात रहा. काही काळानंतर तू सिंहगडाच्या पायथ्याशी पोचशील. पायथ्याशी गेल्यानंतर थोडं वरती चढताना दोन ग्रहस्थ तुझी गाडी अडवून वीस रुपये मागतील. तसे झाले तर तुझा रस्ता चुकला आहे, तू गाडी उजवीकडे वळव आणि थोड्याशा तिरक्या रस्त्याने चालवत रहा. साधारण चार किलोमीटर नंतर खरा सिंहगडचा पायथा लागेल. तिथे तुझ्या अगोदरच काही कारगाड्या, एखादी बस आणि काही मोटार सायकली असतील. तुझ्या लक्षात येईल तू एकटाच रसिक आणि विचित्र नाहीस.

थोडं पुढे गेला कि तुला कळणार नाही खाली जंगलात जाणारा रस्ता धरावा कि वरती चढून जाणारा. वरती चढून जाणारा रस्ता धर आणि चालू लाग. तुला पाचच मिनिटात धाप लागू लागेल. पहिले पंधरा मिनिट खूप जड जातील. तू अजून दहा टक्के पण चढला नसतील तर तुला वाटेल,”मायला चला परत, हे काय आपल्याच्याने जमणार नाही” तरी पण धीर सोडू नकोस आणि हळू हळू चालत राहा. वीस मिनिटानंतर तुझा त्रास कमी व्हायला चालू होईल. शरीर एक गती घेईल, शरीरात एक उर्जा तयार होईल, पाय दुखायचे, धाप लागायची बंद होईल आणि आणि तू एका मशीन सारखा गड चढू लागशील. आता थंडी पण पळू गेलेली असेल. स्वेटर काढून कमरेला गुंडाळ. थोडासा घाम आलेला असेल तर ती डोंगरावरील हवा मस्त वाटेल. आता तुला तू पक्का ट्रेकर असल्याचा भास होईल आणि काही लोक तुझ्याकडे खुप आकर्षित नजरेने बघत आहेत असा तुला भास होईल. तो फक्त भासंच असेल.

निम्म्यावर पोहोचल्यावर तुला पूर्वेकडू सूर्य हळू हळू वरती येताना दिसेल आणि तुझा उत्साह दुप्पट होईल. ती डोंगरात विखुरलेली सूर्याची किरणे आणि तुझ्या शरीरात आलेला उत्साह हा अवर्णनीय असेल. तेवढ्यात तिथे जरा अवघड अशा चढावर दोन सुंदर मुली थकून बसलेल्या दिसतील आणि त्यांना त्यांचे तीन मित्र विनवत असतील, “चलो यार, आब थोडा तो बचा है, बस इत्तुसा बचा है डियर” पण त्या काहि हलायला तयार नसतील. तू त्यांच्याकडे उगीच एक कटाक्ष टाकत रुबाबात पुढे जाशील आणि तुला गेल्या वर्षी तोरणा किंवा तत्सम गड चढताना झालेली एक घटना आठवून तुझ्या तोंडावर स्मितहास्य उत्पन्न होईल.

तू त्या गडाच्या कठीण कडयावरून उतरत असताना आणि खाली काही मुली आणि मुले, मुलीना चढता येत नाही म्हणून खोळंबली होती. मग तू उतरताना त्या मुलीला हात देऊन वरती घेतले होते आणि नंतर खालून हात लाऊन ढकलून वरती चढवले होते. तिने वरती पोहोचल्यावर तुझ्याकडे एक मस्त कटाक्ष टाकला होता आणि त्याचवेळी खाली असलेल्या तिच्या बॉयफ्रेंड वाटणाऱ्या इसमाने तुझ्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला होता. पण तुला माहित होते, जसं तिच्या त्या सेक्सी काटाक्षाला काहीही अर्थ नसतो, क्षणभर आतून गुद्गुल्या करवून घेऊन तो तिथेच सोडून द्यायचा असतो, तसंच तिच्या बॉयफ्रेंड नामक प्राण्याच्या कटाक्षाला पण काही अर्थ नसतो. तो पण तिथेच सोडून देऊन पुढे चालायचे असते.

बरोबर एक तास वीस मिनिटांनी तू गडावर पोहोचशील. तिथल्या सरकारने बांधलेल्या भिंतीवर अंग टाकून दे. जास्त वेळ थांबू नकोस नाहीतर पुढे जाऊ वाटणार नाही. लगेच उठ आणि तिथल्या मावशीकडून मस्त वाफाळलेल्या भुईमुगाच्या वोल्या शेंगा घे. आणि खात खात चालू लाग. आता तुला एका गोष्टीचे बरे वाटेल. तुझ्या बरोबर तुझा कुणीहि मित्र आला नाही. नाहीतर त्या मित्रामुळे सिंहगडला भोगजे करून परत यावे लागले असते. कारण त्यांच्या बायकांनी त्यांना सारखे फोन करून पिडले असते. “ घरी येणारे~~~~प्लीज ~~~, विकेंडला तरी घरी थांबत जा वैगेरे वैगेरे ......

उदाहरणार्थ आपण वरती चढत असतानाच तुझ्या मित्राच्या घरून येणारे फोन तुझ्या डोक्याला शॉट देत असतात आणि तुझ्या मित्रांची तोंडे बघण्यासारखी झालेली असतात.

१.      गोपी, व्हेअर द हेल आर यु, म्यान, यु आर सपोज टू बी ब्याक बाय एट, आय टेल यु, गोपी धिस इस गेटिंग वर्स डे बाय डे
२.      गोपी, कहा पाहोंच गये, जल्दी आओं डार्लिंग, आज मेरी “दि” आ राही है ना ?
३.      गोपी, आरे कुठे आहेस तू ~~~~ कधी येणार परत, आरे विकेंड तरी दे रे कुटंबाला, अगोदर त्या दोस्तांना सोड बरे तू, अरे तू बाथरूम मधील दिवा पण बंद नाही केला जाताना, मी जातेय आईकडे, तू येउच नको आता. (इथे प्रत्येक वाक्यावर अनुसार धरावा)
अशा मित्रांना आणि त्यांच्या कुटुंबाला सिंहगडला येऊन सुद्धा सहन करण्या ऐवजी एकटाच  आला त्याचे तुला समाधान वाटेल. स्वतःला निसर्गाच्या सानिध्यात वेळ दिल्याचा तुला आनंद वाटेल.

आता चालत चालत पस्चीमेकडील बाजूने विंड पोइंटला चालत जा. सूर्य प्रकाशात उजळून गेलेल्या त्या सह्याद्रीच्या रांगेत रुबाबात उभे असलेला राजगड आणि तोरणा खुणावत असेल. तुला त्यावेळी त्या गडाकडे बघून एक मुजरा करू वाटेल. तसं वाटलं तर बिंधास्त कर. लाजायचे कारण नाही. पुढचा राजगढच प्ल्यान करत करत तू विंड पोइंटलं पोहोचशील. तिथे कड्यावर अंग टाकून दे. पश्चिमेकडील तीन हजार फुट खोल दरीतून वरती येणारी हवा आणी इकडे पूर्वेकडून सूर्यप्रकाशात न्हावून येनारी हवा खात जितका वेळ आवडेल तितका वेळ डोळे झाकून पड.

यासारखे दुसरे मेडीटेशन तुला कधीच करायला मिळणार नाही. आता तुला तुझे शरीर हळू हळू हलके वाटू लागेल. आणि तू तुझ्या आयुष्याच्या एक सर्वोच्च क्षण उपभोगत असशील. 








Monday, December 14, 2015

व्यसन वर्तमानपत्राचे

किशोर वयात मला पेपर वाचायचे व्यसन लागले होते. दारू जशी रोज सेमंच असते व कडूच लागते तरी लोकांना ती रोज रोज पिऊ वाटते. तसे पेपरला पण रोज रोज तेच लिहीलेले असले, तरी तेच तेच वाचायचे व्यसन लोकांना लागलेले असते, पण ते मान्य करत नाहीत कि ते व्यसनी आहेत. पण मी सन्माननीय वाचकांना अगोदरच जाहीर कबुली दिली आहे.
सबब त्या काळी मी कला शाखेत शिकत असल्याने काहीच काम नसायचे आणि त्यामुळे माझ्या व्यसनांधतेला सीमाच राहिली नव्हती. मी दररोज तीन-तीन तास तीन चार वर्तमानपत्राचा फडशा पाडायचो. त्यामुळे मला बेन्जामिन नेतण्याहू पासून ते मायावती पर्यंत आणि भैऱ्या बिब्या पासून पीव्ही नार्सिम्हराव, सीताराम केसरी पर्यंत सगळ्यांच्या आयुष्यातील खाजगी आणि राजकीय घटनांची वित्तंबातमी असायची. मग त्या माहित्या मी नको तेव्हा लोकांच्या तोंडावर मारून आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन मांडायचो. पण हळू हळु मला समजले कि गेल्या पंधरा वर्षातील सगळी वर्तमानपत्रे बघितली तर बातम्या त्याच आहेत, संपादकीय तेच आहेत फक्त तारखा आणि नावे बदलली पाहिजेत.
अशा तऱ्हेने पेप्रात काहीच अर्थ नाही हे लक्षात आल्याने आमच्या घरचे पुणेरी “लोकमान्य सकाळ” हे वर्तमानपत्र मी दीडच मिनिटात वाचून पूर्ण करू लागलो. नंतर नंतर मला दीड मिनिट पण खूप वाटू लागला म्हणून मी पेपर्वाल्याकडून तो पेपर घेऊन फक्त टेबलवर ठेवू लागलो. महिन्याला सत्तर रुपये रद्दीचे येतात तेव्हा बरे वाटते पण बिल दीडशे रुपये येते हे लक्षात आले असते तर मला स्वतःला मराठी म्हणवून घ्यायचा अधिकार राहिला नसता.
तर अशाच एका सांप्रतकाळी (मला ह्या शब्दाचा नेमका अर्थ आजून माहित नाही) सकाळला रद्दीत घालत असताना माझी नजर पेपरच्या शेवटच्या पानावर पडली. “मुक्त पीट”. पहिली दोन वाक्य वाचली आणि याशिवाय दुसरे क्लासिक साहित्यच असू शकत नाही असे वाटून मी तो ललित लेख वाचावयास घेतला. गेले सहा महिने हे क्लासिक साहित्य वाचून मी त्या सहा महिन्यातील अगणित लेखांचा गोषवारा आपल्या समोर मांडत आहे.
लेखक/लेखिका खालील नावात सामावलेले असतील -----
• मृण्मयी शहादेकर पानसे किंवा,
• विष्णुदत्त कुळकर्णी इचलकरंजीकर, निवृत्त वरिष्ठ लिपिक ब्यांक ऑफ महाराष्ट्र किंवा,
• अर्जुन पाटील कोठावळेकर, निवृत्त लेफ्टनंट, भारतीय सेना,
• कु. आर्या नचिकेत देशपांडे, कोथरूड, विद्यार्थिनी,
• सौ कलावती धोंडीबा मुरूमवाले वैद्य, गृहिणी
मुक्त पिट
मृण्मयी शहादेकर पानसे
मी तशी नाशिकची. १९८४ साली मला जेव्हा हे पाहायला आले तेव्हा मी नुकतीच बारावी पास झाले होते. पाहण्याचा कार्यक्रम झाला. मी लाजत मुरडत समोर आले. तेव्हाच आमच्या सासरेबुवांचा आवाज मी ऐकला आणि काळजात धस्स झाले. पण तिकडची स्वारी आणि मी गच्चीवर बोलायला गेल्यावर त्यांनी सांगितले कि बाबा खूप प्रेमळ आहेत. फक्त आवाज आणि तोंड भरगच्च आहे, बाकी सगळं ओके आहे. आता नाशिकहून पुण्याला नांदायला यायचे म्हणजे एक दबाव होताच. एक तर पुणे हे त्याकाळी सुद्धा सांस्कृतिकच शहर होते (आता सुद्धा आहेच म्हणा). एकदाची नांदायला आले. सासू आणि मामंजी खूप प्रेमळ भेटले. तिकडच्या स्वारिणी नाही तर मामंजींनीच सांगितले पदवी करून घे. मग मी बाहेरून बीए केले. मामंजीनी त्यांच्या ओळखीच्या पितळे एंड संस मध्ये मला अकौंट कारकून म्हणून तेव्हा लावले ते मी आता गेल्या महिन्यातच सुटले.
पुण्याचा आणि नासिकचा चांगलाच संबंध आणि मिलाप आमच्या घराण्यात झाला. बघता बघता आम्हाला दोन मुले आणि एक मुलगी झाली. नचिकेत, ऋषिकेश, आणि मृणालिनी. नचिकेत आणि ऋषिकेश आता अमेरिकेत असतात आणि मृणालिनी लग्न करून युकेला गेलीय. आमच्या मुलीने आंतर जातीय लग्न करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. जावई हे वैज्ञानिक आहेत. नातवंडे येतात उन्हाळी सुट्टीत. मग आम्ही मजा करतो.
परवाच आम्ही दोघे म्हणजे इकडची स्वारी आणि मी केदारनाथ आणि बद्रीनाथला जाऊन आलो. सासू आणि मामंजी येऊ शकले नाहीत. खूप थकले आहेत. आम्ही केशरी टूर मधून गेल्तो. खूप मजा आली.
एकूण मी पुण्याची सून आहे. मला सकाळने संधी दिल्याने मी आभारी आहे.
पुढील भागात कु. आर्या नचिकेत देशपांडे, कोथरूड, विद्यार्थिनी,


Wednesday, November 18, 2015

सहकार आणि महाराष्ट्र

क्यालिफोर्नियातील आवाढव्य म्हणता येईल अशा संगणक कंपनीच्या वातानुकुलीत पंचतारांकित कार्यालयात बसून गावाकडील आठवनीने तो अंतर्मुख झाला. काही क्षण शून्यात घालवले आणि आठवणीतून बाहेर यायचा प्रयत्न करू लागला पण जमले नाही. त्याला गावाकडील आठवणीतच रमायचे होते. कुणाचाच व्यत्यय नको होता. कारण माणसाला आपण कुठे आलोय यापेक्षा आपण कुठून आलोय हि उंची मोजण्याची इछा नैसर्गिकच असते. तो शून्यात नजर ठेऊन उंची मोजत बसला. त्याला त्याचा दोन गुंड्या शिल्लक राहिलेला मळलेला सदरा आणि कर्दुड्याला छोटीशी तुराटीची काडी गोल गोल फिरवून फ़िट्ट बसवलेली चड्डी आठवली. हातात कुठलीतरी "सारडा क्लोथ सेंटर" वैगरे लिहिलेली किंवा कळकटलेली तारेची पिशवी घेऊन तो शाळेत जात असे.  त्याच काळी त्या भागात साखर कारखाना निघणार म्हणून लोक खुशीत होते. कारखाना येईल, ऊस पिकेल आणि सात पिढ्याचे दारिद्र्य निघून जाईन या आशेने लोक आंनद साजरा करत होते. पण याच्या वडिलांना आणि त्याला खुश व्हायला तेवढी सांध सापडत नव्हती कारण त्यांच्याकडे शेतंच नव्हते. मग काय फायदा ?  त्यावेळी तो आनंदी होऊ शकत नव्हता कारण तेव्हा त्याला कळत नव्हते कि जेव्हा एखादी सहकारी संस्था येते तेव्हा ती फक्त समाजातील एकाच घटकाचे कल्याण करत नाही तर समस्त समाजाचा कायापालट करण्याची ताकद सहकारामध्ये असते. काही दिवसातच त्याच्या वडिलांना नवीन झालेल्या साखर कारखान्यावर कामगार म्हणून घेतले आणि तो नोकरदाराचा मुलगा झाला . त्याच साखर कारखान्याने शाळा काढून पंचक्रोशीतल मुलामुलींची शिक्षणाची सोय केली. आयुष्यात कधी विचार केला नव्हता अशा अभियांत्रिकी कॉलेज मध्ये शिकण्याचे भाग्य त्याला मिळाले ते त्याच साखर कारखान्याने काढलेल्या कॉलेजमुळे.   कधीकाळी इंजिनीअर आणि डॉक्टर होणे  हा फक्त मुंबई पुण्यांच्याच लोकांचा मक्ता होता ते शिक्षण ग्रामीण भागात उपलब्ध करून देऊन सामान्य मराठी जनतेची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती करण्याचे काम ह्या साखर कारखानदारीमुळेच शक्य झाले. आज तो त्याच्या दीड लाख रुपयाच्या ल्यापटोप समोर बसून विचार करतोय कि त्याच्यासारखे लाखो नाही करोडो शेतकऱ्यांची मुलं, मुली पुणे, बेंगलोर, हैदराबाद आणि युरोप अमेरिकेत भारताचे नाव रोशन करत आहेत. खऱ्या अर्थान सुशिक्षित आणि विकसित महाराष्ट्राचा पाया साखर उद्योगानेच रोवला आहे.


अमेरिकेत बसून भूतकाळात जाताना त्याच्या मनात, त्याचे आणि महाराष्ट्राचे वर्तमान आणि भविष्य बनवणाऱ्या साखर उद्योगाच्या इतिहासाची उजळणीच चालू झाली. १९१९ मध्ये महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना "बेलापूर शुगर"  श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव इथे झाला आणि काही शेतकर्यांनी एकत्र येउन माळीनगर इथे जोइन्त स्टोक कंपनी काढून १९३२ साली शेतकर्यांच्या मालकीचा कारखाना चालू झाला.    खाजगी साखर कारखान्यापासून चालू झालेला प्रवास सहकारापार्यंत घेऊन जाण्याचे श्रेय डॉ. धनंजयराव गाडगीळ आणि पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांना द्यावे लागते. १९४८ साली ह्या धुरिणांनी पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे उभा केला. त्यानंतर मा. यशवंतराव चव्हाण, मा. वसंतराव नाईक, मा. वसंत दादा पाटील, मा. शंकरराव चव्हाण, मा. यशवंतराव मोहिते  यांनी साखर उद्योगाला आणि सहकाराला अनुकूल धोरणे आखून हा उद्योग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाण्याचे काम केले. मा. शरदचंद्र पवार यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीत नेहमीच साखर उद्योगाला आणि उद्योगावर आधारित लोकांना पूरक भूमिका घेऊन ती धुरा समर्थपणे सांभाळली आणि आजूनही सांभाळत आहेत. ह्या थोर आणि दूरदर्शी धुरिणांनी मजबूत पायावर  उभ्या राहिलेल्या सहकाराच्या  वेलीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाउन शेतकर्यांच्या, मजुरांच्या आणि इतर साखर उद्योगावर अवलंबून असलेल्या करोडो लोकांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला. खरे नेते, कार्यकर्ते निर्माण करत नाही तर ते नेतेच निर्माण करतात या न्यायाने सहकाराची धुरा खांद्यावर वाहणारे नेते प्रत्येक जिल्ह्यात,  तालुक्यात निर्माण केले.  साखर कारखानदारीमध्ये महाराष्ट्राला आर्थिक विकासाच्या शिखरावर घेऊन जायची ताकद आहे हे आधुनिक महाराष्ट्रातील नेत्यांनी ओळखले होते. कारण खरा विकास हा जनतेच्या हातात पैसा निर्माण करणारे छोट्या मोठ्या उद्योगांचे जाळे राज्यभर निर्माण करूनच होत असतो.  हे ह्या शेतकऱ्याच्या मुशीत तयार झालेल्या महाराष्ट्रातील नेतृत्वाला  चांगलेच समजले होते.

एक साखर कारखाना फक्त ठराविक कामगारांना रोजगार न देता तो त्यावर अवलंबून असलेल्या उसतोड कामगार, ट्रक मालक चालक, आणि आवतीभोवती उभी राहणारी व्यापारी संकुले यामार्फत पूर्ण तालुक्याचा विकास करतो.  महत्वाचे म्हणजे अर्थव्यवस्थेचा महत्वाचा घटक असलेल्या शेतकऱ्याला स्वावलंबी बनवतो. अशा कोट्यावधी मराठी लोकांचा विकास केल्यानेच महाराष्ट्राला एक औद्योगिक राज्य म्हणून देशात वोळख मिळाली आहे. आज अखेर महाराष्ट्रात सुमारे १७० हून अधिक चालू सहकारी आणि खाजगी साखर कारखाने आहेत ज्यांनी ग्रामीण भागात करोडो लोकांना रोजगार पुरविला आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्या असलेल्या देशाला पाशिमात्या विकासाचे मॉडेल पुरणार नाही तर विकासाचे विकेंद्रीकरण करून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि भांडवल निर्मिती करावी लागणार आहे. आणि असे विकासाचे विकेंद्रीकरण करण्यात यश मिळाल्याने साखर उद्योग हा  ग्रामीण भागातून शहरात रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवण्यात यशस्वी झाल आहे. नाही तर आज महाराष्ट्रात शहरे बकाल, गर्दीने आणि गरिबीने भरलेली आणि गावे ओसाड दिसली असती. आज जर सहकाराशिवाय आणि साखर उद्योगाशिवाय महाराष्ट्राचा विचार केला तर पहिला प्रश्न उपस्थित होतो कि साखर उद्योगात गुंतलेल्या करोडो लोकांना रोजगार देण्याची क्षमता आपल्या शहरामध्ये आहे काय? उत्तर अर्थातच नाही असे आहे. याचवेळी याच सहकाराच्या आणि साखर उद्योगाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या शिक्षण संस्था मधून शिकून बाहेर पडलेल्या सुशिक्षित पिढीने देशाला उदारीकरनाच्या लाटेमध्ये टिकवून ठेवण्याचे काम केले आहे. एकीकडे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करून दुसरीकडे उदारीकानाला समर्थपणे तोंड देत शहरीकरणाचा एक अविभाज्य घटक म्हणजे सुशिक्षित आणि कुशल कामगार पुरवण्याचे काम पण ह्या साखर उद्योगानेच केले आहे.

आज पर्यंत महाराष्ट्रातील नेतृत्वाने  साखर उद्योगात राजकारण आणले, पण राजकारणामुळे तो उध्वस्त होणार नाही याची पण काळजी घेतली.  सहकाराचा पाया मजबूत करणाऱ्या ह्या धुरिणांनी गावोगाव फिरून वेळप्रसंगी स्वत:च्या जमिनी देवून, लोकांची जागृती करून हि मंदिरे बनवली. पण आज काही अपवादात्मक वाईट प्रवृत्ती यात घुसल्या आहेत. काही अपवादात्मक लोकामुळे आज साखर उद्योगापासून अनभिज्ञ असलेल्या लोकांना सहकारमहर्षि मध्ये साखर सम्राट दिसत आहेत,  शिक्षणमहर्षि मध्ये शिक्षणसम्राट दिसत आहेत. त्यांचे गैरसमज दूर करणे महत्वाचे आहे. ज्या उद्योगाने लाखो लोकांच्या घरातील चुली पेटवल्या त्या उद्योग्धन्द्यावर आज ऊस जास्त पाणी खातो म्हणून टीका करताना दोन वेळा विचार करण्याची तसदी सुद्धा काही विद्वान घेताना दिसत नाहीत. पाणी हि एक राष्ट्रीय संपत्ती आहे त्याचा वापर करून वाढवलेला ऊस हा त्या राष्ट्रीय संपत्तीची मुल्यवर्धीच करतो. कारण उसापासून साखर, इथिनोल, वीज, वेगवेगळ्या प्रकारची  केमिकल्स,  इंडस्ट्रीयल अल्कोहोल, मद्यनिर्मिती, चिपाडापासून पार्टिकल बोर्ड, मळीचे खत, तयार करून साखर उद्योग हा राष्ट्रीय उत्पन्नात भरच तर घालतोच, पण ऊस लागण करणारे मजूर, उस वाहतून करणारे ट्रक मालक-चालक, शेतकरी, साखर कामगार, साखरेची विक्री करणारे, कारखान्याला सुटे भाग आणि इतर माल पुरवणारे अशा ह्या उद्योगावर डायरेक्ट किंवा इंडारेक्ट अवलंबून असणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाची सोय पण करतो. त्याचप्रमाणे ह्याच उसाचा १५% हिस्सा हा जनावरांसाठी चारा म्हणून वापरला जातो. राज्यातील जनावरांच्या चाऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी सुद्धा ऊस मदत करतो. वरील मुल्यावर्धी लक्षात घेता कोणताही चांगला अर्थतज्ञ आपल्याकडे असलेल्या राष्ट्रीय संपत्तीला म्हणजे पाण्याला कुजवण्याचा सल्ला देणार नाही.  उसा सारख्या पिकावर बंदी किंवा बंधने आणण्याची मागणी करताना आपण कल्पवृक्षावर बंदी आणण्याची मागणी करत आहोत हे सुद्धा लोक विसरून जातात. साखर कारखाने चालवायला खूप पाणी लागते हा एक लोकामध्ये पसरलेला खूप मोठा गैरसमज आहे. एक साखर कारखाना चालवायला खूप कमी पाणी लागते आणि तेच तेच पाणी रिसायकल करून पुन्हा वापरले जाते. लोकांची या विषयावर जनजागृती होणे आवश्यक आहे.

काळानुसार बदलायला पाहिजे. हे मानसासाठी पण लागू होते आणि उद्योग धंद्याला तर जास्तच लागू होते.  जागतिक स्पर्धेत आपले उद्योग टिकतिलंच पण वाढतील सुद्धा याची काळजी महाराष्ट्रातील साखर उद्योगात गुंतलेले लोक घेतील अशी अपेक्षा आहे. हा विचार त्याच्या मनात येतो. कारण उस हे एकंच पिक असे आहे कि शेतकर्यांना त्याचा मोबदला कोणत्याही मध्यस्था शिवाय त्याच्या खिशात पडतो. म्हणून तो अधिक असतो. तसेच गारपीट, अवकाळी पाउस ह्या असल्या धोक्यापासून ऊस हा सुरक्षित आहे आणि शेतकऱ्यांसाठी हमखास पैशाचे पिक आहे. शेतकर्यांना गरिबीतून बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे ऊस आणि साखर उद्योग.

आज ह्याच उद्योगातील अनुभवी आणि नवीन मंडळी खाजगी साखर कारखानदारीच्या माध्यमातून हा उद्योग जिवंत ठेवण्याचे प्रयत्न करत आहेत ते म्हणजे काळ्या ढगाला असलेली चंदेरी किनारच म्हणावी लागेल. खाजगी साखर कारखानदारीच्या माध्यमातून उद्योग निर्माण करणारे पण शेतकऱ्यामधून आलेलेच अनुभवी लोक आहेत, जे ह्या  उद्योगाला नवीन उंचीवर घेऊन जातील अशी अपेक्षा आहे. जागतिक बाजारातील स्पर्धेत टिकण्यासाठी उत्पादकता वाढवणे हे ध्येय घेऊन पुढे आलेल्या ह्या लोकाकडून साखर उद्योगावर अवलंबून असलेल्या लोकांना खूप अपेक्षा आहेत. खऱ्या अर्थाने आज भारत साखर निर्यात पण करत नाही आणि आयात पण करत नाही पण भारताच्या १२० कोटी जनतेला पुरेल एवढी साखर सध्या भारतात बनते. त्यातील ४०% साखरेचा वाटा महाराष्ट्राने घेऊन भारतात आणि जगात महाराष्ट्राची मान ताट केली आहे.  परंतु अजून दहा वर्षाचा विचार करता भारताच्या वाढणाऱ्या लोकसंखेला साखर पुरवण्यासाठी साखर उद्योग  टिकलाच पाहिजे असे नाही तर वाढला सुद्धा पहिजे. ठीबक सिंचनाचे जाळे विस्तारून, कमी पाण्यात येणाऱ्या उसाच्या नवीन जाती निर्माण करून, ऑटोमेषण आणून हा रोगग्रस्त झालेला उद्योग पुन्हा उभारी घेऊ शकतो.

पण आजची स्थिती काय आहे ? त्याला माहित आहे, आजही अनेक साखर कारखाने खूप चांगल्या रीतीने चालू आहेत. पण भविष्यात ते नुसतेच टिकलेच पाहिजेत असे नाही तर त्यांची प्रगती पण झाली पाहिजे. साखरेला भाव न मिळाल्याने, कधी दुष्काळी परिस्थितीमुळे, कधी भांडवलाच्या कमतरतेमुळे तर कधी चुकीच्या व्यवस्थापनामुळे बंद पडलेले कारखाने पण त्याच्या डोळ्यासमोर येतात, त्या काही बंद पडलेल्या कारखान्यातील देशोधडीला लागलेला कामगार त्याच्या डोळ्यासमोर येतो. काम नाही, शिक्षण नाही म्हणून बेकार फिरणारा कामगाराचा मुलगा त्याच्या डोळ्यासमोर येतो, तीस वर्ष उलटून पण लग्नाची वाट बघत बसलेली साखर कामगाराची मुलगी त्याच्या डोळ्यासमोर येते, त्याच्या डोळ्यासमोर उस रानात वाळून चाललाय म्हणून डोळ्यात धड पाणी पण आणू न शकणारा आणि आतून खंगलेला शेतकरी येतो. कधीतरी हे कारखाने चालू होतील आणि त्यांच्या चुली पेटतील अशी त्याला अजून आशा आहे. कारण कोणतीच अडचण नवीन नसते. सगळ्या अडचणी जुन्याच असतात फक्त  आपल्याला उपाय शोधण्याची गरज असते. ते उपाय आपल्या आसपासच असतात.  शोधण्याचा प्रयत्न केला तर ते नक्की सापडतात.  आज वेळेतच जर आजारी पडत चाललेल्या साखर उद्योगावर उपाय  केले नाहीत तर हा उद्योग पण मुंबईतल्या कापड उद्योगासारखा इतिहास जमा झाल्याशिवाय राहणार नाही.  हा विचार करून तो बसल्या जागी अस्वस्थ होतो आणि तसाच विचार करत खुर्चीत बसून राहतो.

कथा समाप्त --- पार्श्वाभागामध्ये बदल.

शेवट - conclusion :

महाराष्ट्रातील साखर उद्योगाचा आढावा आपण तळागाळातून येउन साखर उद्योगाच्या माध्यमातून आज यशाची शिखरे चढत असलेल्या एका घटकाला केंद्रित ठेवून घेतला. कोणताही उद्योग, कोणतीही घटना किंवा कोणताही घटक हा माणूस केंद्रित ठेवून बघितला तरच त्याचे महत्व समजते. कथेच्या नायकच्या रूपाने आपण  साखर उद्योगाचा थोडक्यात इतीहास, आजची स्थिती , अडचणी, फायदे, त्याची गरज यावर प्रकाश टाकला.

गेल्या बेचाळीस वर्षापासून याग्रीकल्चरल डेवलपमेण्ट ट्रस्ट, बारामती हे, पाणी,  शेती आणि शेतीपूरक उद्योगांच्या विकासावर भर देऊन रोजगार निर्मिती आणि मुल्यावर्धी करत आहे.  शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांचा आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला चांगले  यश पण मिळत आहे. ग़रज आहे ती सर्वांच्या सहभागाची.

आज महाराष्ट्राची जीवनरेषा असलेला हा साखर उद्योग अडचणीतून जात आहे. तरीही ह्या उद्योगावर अवलंबून असलेले आणि हा उद्योग ज्यांच्यावर अवलंबून आहे असे महत्वाचे घटक, ह्या कल्पवृक्षाला असे संपवू देणार नाहीत अशी आशा आहे.   प्रशासन, केंद्र आणि राज्य सरकार आणि धोरण आखणारे नेते, शेतकरी, शेतकरी हितासाठी लढणाऱ्या संघटना,  कामगार, उसतोड मजूर, उस वाहतूकदार,  या सर्वांमध्ये साखर उद्योगाला लहान सहान लाटामधून तारून नेण्याची ताकद आहे.  आणि हे सगळे घटक मिळून ह्या उद्योगाला नवी उभारी देण्याचे काम करतील अशी आशा आज महाराष्ट्र आपल्याकडून बाळगून आहे.

जय हिंद जय महाराष्ट्र.

विकास मोहनराव गोडगे.


















Monday, October 26, 2015

एकटेपणा आणि म्हातारी

आजपण ती नेहमीप्रमाणे तिन्ही सांजंला कुणाच्या तरी रानातून कामाहून आली. कधीकाळी पक्क्या घराची आता फक्त दगडंच उरलेली भिंत आणि वरती चार लोखंडी पत्रे असलेल्या खोलीच कवाड ढकलंलं आणि तशीच दारात बसली. दरवाजातंच बांधलेल्या शेळीने, मालकीण आल्याने आपल्याला पाणी पाजील म्हणून हालचाल केली पण तिने त्या शेळिकडे दुर्लक्षच केले. त्या कातरवेळेतिल संधीप्रकाशात तिने काड्याची पेटी शोधण्याचा प्रयत्न केला. तिथंच चुलीवर होती हे माहित असलेल्या तीने झटकन काडी पेटवली आणि तिच्या त्या एकदम झालेल्या प्रकाशात म्हातारीचा चेहरा काही सेकंद उजळून निघाला. तिच्या सृरकटलेल्या कपाळाच्या त्वचेवर मोठे निळे गोंदवन आणि पांढऱ्या केसाचा बुचका काही सेकंदापुरते उठून दिसला आणि पुन्हा त्याच भुरकट धुरकट वातावरणाने त्या घराचा ताबा घेतला. चुलीवरच्या चिमणीने आपल्याला अंधुक वाटणारा पण म्हातारीला पुरेसा प्रकाश द्यायला चालू केला. तिनं तिथल्याच दोन तुराट्या चुलीत घालून चूल पेटवली. चुलीच्या प्रकाशात आता त्या धुरकट खोलीतील वस्तू जरा स्पष्ट दिसू लागल्या. भिंतीच्या वरल्या बाजूला काळ्या भंगार झालेल्या लाकडी फळीवरील काही पितळेचे हांडे आणि भांडी हि तिच्या जुन्या भरल्या घराची साक्ष देत होती आणि खालीच पडलेली एक सगळीकडे आणि फाटून जीर्ण झालेली वळकटी तिचे वर्तमान सांगत होती. चुलीवर जर्मनची तवली ठेवून त्यात घोटभर पाणी टाकलं आणि घरातील उजेड कमी होऊन पुन्हा भुरकट वातावरण तयार झालं

ती तसंच बसल्या अवस्थेत जरासं दरवाज्यात आली आणि शेळीला पिळू लागली. तिचा संध्याकाळचा चहा हा संध्याकाळ इतकाच नियमित होता. रात्री ती शेळीला जवळच घेऊन झोपायची.

पंधरा वर्षापूर्वी पोरगी नांदायला गेली. वाटणीचा हिस्सा घेऊन गेली. लगेच काही वर्षांनी पोरगं पण अपघातात गेलं. सुनबाई जमीन विकून तिच्या लहान पोराला घेऊन माहेरी गेली.  आता ती निवांत जगतेय. जगण्यासाठी कुटुंबाची गरज असते ह्या समजुतीवर तिने मात केलीय.




Monday, October 12, 2015

दीपिका पादुकोने आणि गावाचा दुष्काळ निवारण

तिन्ही सांजला रानातून आलेली, गावातच दिवसभर कुत्री मारीत बसलेली, देवळात अंग खाजवत बसलेली कामाची, बिनकामाची सगळी मंडळी पंचायतीत जमली होती. एक दोन मेंबरं कुठं तरी पिउन पडली असतील नाही तर सगळी हजर होती. ज्या बाया मेंबर होत्या त्यांची मालकं हजर होती. यंदा ओबीसीचा सरपंच असल्याने लव्हाराचा दाद्या भाता तसाच जळता ठेवून मिटिंगिला आला होता आणि कोपऱ्यात आपला गुपचूप आन्द्याधारकपणे बसला होता. 

"बत्ती वाढवकिरं जरा , मायला राकेल काय घरचं आणायचं हाय व्हय!" भिबिषण आप्पांनी  पंचायतीच्या शिपायावर रुबाब मारला आणि सगळ्यांनी  भिबिषण आप्पाला अनुमोदन दिले.

"व्हय व्हय व्हय बत्ती मोठी करा, ह्याच्यायला शिपाई माजलाच हाय जरा" गर्दीतून एकमताचा आवाज.

बत्ती वाढविली. कुठून तरी आवाज आला, "मायला अच्छे दिन तर कधी यायचं कुणास ठाऊक, गावात लाईट तर कवाच नस्तिय"

कुणीतरी ते स्वतःच्या अंगावर घेऊन म्हणालं,  "तुम्ही तर काय केलं साठ वर्षात, फक्त बारामतीचाच इकास केला कि! "

"अय साहेबाला काय म्हणशील तर पाय तोडून हातात दिल", पाटलाचा राजा उठून त्या माणसाच्या अंगावर जात म्हणाला. 

कल्ला होणार भांडण लांबणार तेवढ्यात भैरा बिब्या म्हणाला, "तुम्ही आशीच आयघालणार असाल तर मी जातो आपला" मग सगळी शांत बसली.

भैऱ्या बिब्याने लव्हारच्या दाद्याला खुणावले आणि पुढे यायला सांगितले. दाद्या सरपंच होता. पुढे आला आणि गुपचूप बिब्याकडे,  आता काय करू ह्या नजरेने बघत बसला.

"हं मांडा ठराव सरपंच साहेब." बिब्या

दाद्याला काय करायचे नाही समजून हिकडं तिकडं बघू लागला.

आहो दादाराव, मी लिहून दिलेला कागुद काढा आणि वाचून दाखवा ठराव पंचायतीला. मग मंजूर करून पुढची कारवाही करायला सगळी रिकामी व्हत्याल.

"आज ह्या ठिकाणी ग्रामपंचायत मौजे खड्कलगाव हा ठराव एकमताने मंजूर करत आहे कि मा.  मुख्यमंत्री महोदय  श्री फडणवीस नाना यांनी कुमारी दीपिका पादुकोने  यांची आमच्याच आणि फकस्त आमच्याच  गावातील दुष्काळ निवारण आणि शेतकरी संगोपन ह्या कामावर निवड करावी. कुमारी दीपिका पादुकोने यांच्या दांडग्या अनुभवाचा फायदा मौजे खडकलगावातील शेतकऱ्याना आणि त्यांच्या पोरासोरांना व्हायलाच पाहिजे असे गावातील समस्त मंडळींचे मागणे आहे.  आणि ह्या मागणीसाठी उद्या सकाळी तहसीलदाराला एक निवेदन गावातील सगळी मंडळी मोर्चाने जाउन देतील. तसेच नाना पाटेकर, आणि मकरंद अनासपुरे यांच्या कार्याची गरज आम्हाला नसून शेजारच्या गावाला जास्त आहे असा एक सल्ला पण मुख्य मंत्र्यांना देण्यात येईल.कुमारी दीपिका पादुकोने ऐवजी मुख्यमंत्र्यांनी जर श्रीमती मेधाताई भाटकर वैगेरे नवाची शिफारस केली तर सरकारला खडकलगावातील जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल. 


सरपंच मौजे खडकलगाव 
दादासाहेब लोहार 


"आता हा ठराव गावाच्या चावडीवर लावा आणि सगळ्यांना सांगा उद्या भाकरी बांधून तालुक्याला तहशील दाराला निवेदन द्यायला हजर राव्हा. " भैऱ्या बिब्याने शिपायाला आदेश दिला. 

निवेदन चावडीवर लागले आणि गावात एकंच चर्चा. दीपिका पादुकोणे गावात येणार आणि आपल्या गावाला दुष्काळातून मुक्त करणार. आता दुष्काळातून मुक्त करणार त्यापेक्षा ती येणार म्हणून लोकांनी केस कापायला वारकाच्या  दुकानात गर्दी केली. लोकं कपडे भट्टीला देऊ लागली. आज नाही आली तर उद्या येइलच यावर लोकांचा इश्वास होता. भैरा बिब्याने ह्यात पुढाकार घेतलाय म्हणल्यावर हे काय फेल जाणार नाही ह्याची लोकांना खात्री होती. बघता बघता बातमी गावात पसरली आणि गावातील बायकांना काय करावे आणि काय नाही तेच समजेना. 

सांच्याला चांदणी वरी आली, घरातील गडी  माणसं भाकरी खाउन गप्पा मारायला देवळात, चावडीवर गेली. आजतर काय दीपिका शिवाय विषयच नव्हता. 

गांधारी मावशीच्या कानावर हि गोष्ट गेली आणि तिने गावातील काही बायकांची मिटिंग बोलवून धोका सांगितला. 

"आगं बायानो, पोरीनो, हि दीपिका का कोण हाय बाजार बसवी ती जर गावात आली तर आपली माणसं कामातून गेलीच समजा, याड लागून जाइल सगळ्यांना. तर आपुन बी ह्या दीपिकाच्या विरोधात उद्या तालुक्याला तहसिलदाराच्या अंगावर मोर्चा न्यायाचा हाय, आपली मागणी एकंच असंल, आम्हाला नाना पाटेकर, मकरंद का फिकरंद कोण हाय त्यो चालंल पण ती दीपिका नकु. कुणीच नाही जमलं तर ती श्रीमती मेधाताई भाटकर पण चालंल तसबी तिला आता कायबी काम नसलंच." तर गांधारी मावशीच्या पंच्यायतीत हा ठराव पण एकमताने मंजूर झाला. 

सकाळी उठून बायांनी आपाप्ल्यासाठी भाकरी केल्या आणि बांधून घेऊन तालुक्याला जायला शाळेपाशी जमा झाल्या. गडी माणसाना भाकरी नाही दिल्याने घराघरातून भांडणाचे आवाज ऐकू येऊ लागले. त्यामुळे गडी माणसं हारुन तशीच चावडीत जमा झाली. भाकरी नाही मिळाल्याची तक्रार बिब्या पर्यंत गेली आणि बिब्याने घोषणा केली "सगळ्या लोकांना तालुक्याच्या गावाला गेल्यावर पंचायती तर्फे झुणका भाकर मिळेल" लोकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. 


तर दुसऱ्या दिवशी खडकलगावातून दोन मोर्चे तहसील कार्यालावर गेले.एक बाया माणसांचा आणि दुसरा गाडी माणसांचा. जेव्हा हे दोन मोर्चे तहसील कार्यालयावर गेले तेव्हा यांना समजले कि अशा अनेक गावातून पुरुष मंडळींचे मोर्चे आले होते आणि सगळ्यांची मागणी फकस्त आणि फकस्त "दीपिका पादुकोने" हीच होती. श्री श्री नाना फडणवीस ह्या मुख्यमंत्र्यांच्या जयघोषात लोक दीपिकाला मागणी घालत होते. शेवटी तहसीलदाराला  पोलिसांना पाचारण करून "सौम्य लाठीमार " करावा लागला. अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. लोक दीपिका दीपिका करत रस्त्याने बोम्बलत आणि लंगडत फिरू लागले.भैरा बिब्या आपला तिथली ओळखीच्या दारूच्या दुकानात शिप शिप घेत बसला होता. आणि आमदार साहेबाना फोन करून तहसीलदाराची बादलीच करतो म्हणून दारू दुकानाच्या मालकाला सांगत होता.   












Wednesday, September 23, 2015

गणपती

आम्ही म्हणजेज गाव असा आमच्या तरुण मंडळाचा आव असायचा. क्रिकेट असो, हॉलीबॉल असो, राजकारण असो आमचे तरुण मंडळच एक नंबरला असायचे. पण आम्ही आजपर्यंत गणपती बसवला नव्हता. गणपतीत रिकामे राहणे, लोकांच्या मिरवणुकीत धिंगाणा घालणे,  संध्याकाळी गणपती बघायला नटून बाहेर पडलेल्या पोरीवर लाईनी मारत फिरणे  इत्यादी इत्यादी कृत्ये करण्यासाठी आपण रिकामे म्हणजेच सडं आसलं पाहिजे यावर आमच्या बहुतेक सदस्यांचे एकमत असे.

पण आजकाल वरच्या गल्लीचा गणपती खूपंच मोठा होतोय आणि त्यांच्या गणपतीला गर्दी पण जास्त जमत असल्याने त्या मंडळाचा गावात वट्ट वाढत  होता. त्यामुळे आमच्या कार्यकर्ते मंडळीत जरा चलबिचल चालू झाली होती.  त्यात गेल्या वर्षी त्यांच्या गणपतीची चर्चा आमच्या गल्लीतल्या पोरी करत होत्या हि बातमी सांगून लंगड्या संत्याने कार्यकर्त्यांच्या असंतोषात आणखी भर घातली. आता एकूण आमच्या इज्जतीचा प्रश्न निर्माण झाला होता. मग एके रम्य संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी गावाबाहेरच्या टेकडीवर जमून तंबाखू मळत मळत आणि चघळत चघळत गणपती बसवण्याचा निर्णय घेतला. ह्या ठरावा नंतर  आमच्या लंगड्या संत्याने उभा राहून एक जोरदार शिट्टी मारून आनंद साजरा केला. हा लंगडा संत्या लय बिलींदर होता आणि गणपतीचा मोठा भक्त पण होता.

लगेच गणेश मंडळाचा अध्यक्ष, खजिनदार वैगेरे ठरवले गेले. एका खूपच उत्साही आणि कंडबाज कार्यकर्त्याचे दुकान होते त्याला खजिनदार केले. आता कुठे पैसे कमी पडले तरी तो त्यात भर घालणार हे आम्हाला माहित होते. घरटी शंभर रुपये वर्गणी जमा  केली. गल्लीत एक माणूस स्वतःला लय शहाणा समजत होता त्यांच्या घरी वर्गणी न मागता बहिष्कार टाकला. मग गणपती आणण्याच्या दिवशी त्याची बायको आली आणि स्वतः वर्गणी देऊन निघून गेली. मग आम्ही कशी जिरवली म्हणून एकमेकाला टाळ्या देऊन पाशवी आनंद साजरा केला.

दहा दिवस कार्यकर्ते एकदम खुश आणि मग्न होते. कुणीही मंडपात डाव खेळायचा नाही हे पथ्य पाळले होते. आय बाया यायच्या त्यांच्याबरोबर त्यांच्या पोरीपण यायच्या आणि आमचे कार्यकर्ते कॉलर ताईट करून मूर्तीजवळ किंवा बाजूला खुर्ची टाकून आपला मंडळात किती वट्ट आहे हे भक्तांना दाखवायचा प्रयत्न करायचे.
दहाव्या दिवशी मिरवणूक. मिरवणुकीवर ठरणार होते कि कोणत्या मंडळाचा गावात जास्त वट्ट आहे. मोठी बैलगाडी नारळाच्या फाट्यानि सजवली. गर्दी जमा करायचे तंत्र आम्हाला माहित होते. मंडळातील कार्याकार्त्यासाठी "OC" च्या पन्नास बाटल्या आणि बाकी गावातील म्हातारी कोतारी, बेवडी, आणि इतर मंडळी साठी हातभट्टीचे दोन मोठे दहा लिटरचे क्यान आणले होते.

बघता बघता रस्त्यात गर्दी मायना गेली. कार्यकर्ते जोशात नाचत होते. आपल्या डावाच्या घरापुढे आले कि एकेकाच्या अंगात मिथुनच येत होता. जरा उतरली कि बाजूला जायचे आणि दोन ग्लास एकाच दणक्यात संपवून पुन्हा मिरवणुकीत दाखल. त्यामुळे उत्साह कमी होण्याचा प्रश्नच नव्हता. "खली वल्ली खलि वल्ली खलि वल्ली' "येऊ कशी तशी मी नांदायला" मुंगळा " ह्या गाण्यांनी धुरुळा केलता. म्हातारी कोतारी पटके पाडोस्तोवर हातभट्टी मारून नाचत होती. एकूण आमची हवा झाली होती. रात्रीचे बारा वाजले. इंग्रजी माल संपला आणि कार्यकर्त्यांनी हातभट्टी मारायला चालू केली. कुणीच शुद्धीत नसण्याच्या अवस्थेत एका गावाबाहेरील विहिरीत गणेश विसर्जन झाले.

मिरवणूक विहिरी पर्यंत जाईपर्यंत निम्मे कार्यकर्ते पिवून रस्त्यावर आणि काही रस्त्याच्या कडेल शेतात पडले होते. त्यात लंगडा संत्या पण होता. दिवस उगवायच्या आधीच त्याची उतरली. डोळे चोळत गावाकडे बघितले आणि गावातून येणार्या आवाजांनी तो ताडकन उठला आणि गावाकड पळत सुटला.त्याचे आई, वडील, बहिण त्याच्या मातीच्या घराखाली गाडले गेले होते. अशी अनेक कुटुंबे गाडली गेली होती. भूकंपाने गावावर अवकळा आणली होती. संत्याने त्या मातीच्या ढिगार्याकडे बघितले, तिथेच जवळ असलेल्या गणपतीच्या रिकाम्या मंडपाकडे बघितले. त्याच्या आईवडिलाना गणपती वाचवू शकला नव्हता. त्याने आपल्या गळ्यातील गणपतीचा ताईत काढून त्याच्याकडे बघितले आणि तो ताईत दूर फेकून देऊन तो मातीचा ढिगारा उपसायला चालू केले. एकट्यानेच.






Wednesday, September 16, 2015

पोळ्याचे बैल आणि ईटू

नदीला पाणी आलंय म्हणून आज हि दोनचार गाबडी शाळेच्या पिशव्या हातात घेऊन तडक नदीला पोचली. नदीला पाणी आल्यावर शाळा वैगेरे गोष्टी म्हणजे त्यांच्यासाठी उगीचच असतात. घरच्यांना पण पोरं शाळेत गेलीत का कुठ कुत्री मारीत फिरत आहेत हे बघायला वेळ नसतो. तुरी फवारायच्या, कापूस फवारायचा, ज्वारीची पेरणी करायची असली उत्पादक कामं सोडून लेकरा मागे फिरायला कुणाला सवड असणार आहे! त्यांनी दप्तर नदीच्या कडेला ठेवले आणि जरा पुढे जाउन चिखल गोळा करू लागली. तेव्हढ्यात नामु परटाने धुनी धुताना ह्या चौघांना बघितले आणि जोरात शिवी हासडून म्हणाला, "ये ~~~~ गाबड्यानो, पळता का नाही शाळेत, नाहीतर एकेकाचं टांगडच तोडीन" हि चौघं थोडी गुर्मी दाखवून तिथंच थांबली. पण नामु खरंच पाण्याच्या बाहेर निघून मारायला येतोय हे बघून पोरं पण दप्तर घेऊन शाळेच्या दिशेने चालण्याचे नाटक करू लागली. नदीच्या जरा खाल्लाकडच्या बाजूला नामुच्या नजरे आड जाऊन नदीत शिरली. काळ्या चिकन मातीचा चिखल जमा केला. कडेच्या पाण्यात पोहण्याचे नाटक केले आणि तशीच चिखलात घाण झालेली कपडे घालून गावात आली.
भर दुपारचं गावात कुत्री पण दिसत नव्हती. त्या पूर्ण उभट गल्लीत कधीतरी वैभवाच्या असलेल्या काही खुणा अंगावर ठेवून भग्नावस्थेत दिवस काढणाऱ्या वाड्याच्या एका वट्ट्यावर बसून ती मुलं चिखल तिंबण्यात गढून गेली. चिखल तीम्बल्या नंतर चालू झाला खेळ "अक्का का बोका, कसाकाय ठोका". म्हणजे चिखलाचा मोठा खोल्या तयार करायचा आणि तो खाली जोरात पालता आपटायाचा. मोठा आवाज होऊन त्या दुपारची शांतता भंग करतो आणि त्या पडक्या वाड्याच्या छिन्न भिंतीतील बिळात शांत पडलेल्या चिमण्यांचा चिवचिवाट चालू होतो. त्या चिखलाच्या खोल्याला वरून भोक पडते ते दुसर्यांनी चिखलाची छोटी चपाती करून भुजवायचे. अशा तर्हेने चिखल जिंकायचा खेळ चालू झाला. दोन तीन तास असा खेळ खेळून झाल्यावर जो चिखल तयार होतो ते एक नंबर मटेरियल असते बैल किंवा काहीही बनवण्यासाठी.
ईटु, कल्या आणि फ़त्र छान बैल बनवतात. लंगडा राजा उगीच सगळ्या गोष्टीची नाटकं करतो. त्याच्याच्यान होत काहीच नाही पण भांडनाला एक नंबर आहे. इटुने दोन बैलं आणि एक खोंड बनवलं. पळत पळत घरी जाउन ज्वारी आणली आणि त्या ज्वारीचे डोळे सगळ्या बैलांना लावले. आणि बैलांना पुन्हा पुन्हा थुका लावून मालिश करू लागले. आता बैलं तयार झाली. संध्याकाळी आबा आलं कि आठाणे घेऊन बैलांना दुकानातून झुली आणि चमकीचे कागद आणून सजवायचं म्हणून इटु तिन्ही सांजा व्हायची वाट बघत बसला. उद्या पोळा असल्याने रानातली लोक आज लवकर घरी येणार हे त्या पोरांना माहित होते.
इटुचे आबा आणि आई आली, ईटुने त्यांच्याकडून आठाणे आणून बैलांना मस्त सजवू लागला. तेवढ्यात कल्याने ईटुला बोलावून त्यांच्या परसातील बैल कशी सजवत आहेत ते बघायला न्हेलं. कल्याचे वडील त्यांच्या चार बैलांना घासून धूत होते, कल्या पण धुऊ लागत होता, शिंगे कातरीने तासंत होते, आता त्या खिल्लारी बैलांच्या सिंगाला कल्याचे वडील हिंगुळ आणि बिगुड लावून रंगवु लागले. इटु तिथून तडक घरी पळत आला आणि त्याच्या वडिलांना म्हणाला, "आताच्या आता आपल्या "हिऱ्याला" घेऊन या नाहीतर कायच खरं नाही तुमचं" आणि मोठ्याने रडू लागला. उद्या पोळा आहे, आपल्या दोस्ताना बैलं आहेत आणि आपली बैलं नाहीत हे त्याला खूपच वाईट होते. इटूची आई त्याला समजाउन सांगू लागली, आरं बाळा किती चांगली चिखलाची बैलं केलीयत तू, त्याच बैला बरोबर खेळावं …वैगेरे वैगेरे. इटुने तसलं काय नगं, मला आपली "हिऱ्या-मव्हऱ्या" आताची आता आणून द्या म्हणाला आणि ते चिखलाचे झटून केलेले दोन बैल भिंतीवर मारले. त्या बैलाचा चिखल होऊन त्या भिंतीच्या चिखलात मिसळून गेला. आणि त्याचे वडील उठून घराबाहेर पडले. चालताना त्यांच्या डोळ्यात पाणी होते. इटुच्या वडिलांच्या डोळ्यातील पाणी फक्त त्यांनाच दिसत होते. त्यांचा "हिऱ्या" दोनच महिन्यापूर्वी पोट फुगून मेला होता आणि त्यांनी कर्ज झाले म्हणून "मव्हर्याला" विकून सावकाराचे व्याज भागवले होते.


माझा इंजनेर पोरावर आणि पोरीवर लहानपणापासून राग आहे. म्हणजे मी खरंच लाइन मारत असलेल्या आणि मनापासून प्रेम करत असलेल्या बहुतेक पोरी ह्या इंजीनियरिंगला गेल्या आणि मी कलेला कवटाळले. अर्थात त्या ललनाणी इंजिनीयरिंगला जाउन काय दिवे लावले हा संशोधनाचा विषय होऊ शकतो पण कले पेक्षा ते भारी असते आणि त्याने पोट भरते ह्या एकाच कारणामुळे ह्या पोरी सुट्टीला गावी जीनची प्याण्ट घालून आल्या कि आमच्यासारख्या कलेच्या पोराकाडे तुच्छ  नजरेने बघत. बरे ह्या तुच्छ  नजरेने बघतात ते पण समजून घेऊ. पण ह्यांना त्यांच्या कॉलेजच्या शहरापासून आमच्या गावापर्यंत सोडायला त्यांचे तसलेच जीन्स प्यांट आणि बुट घातलेले दोस्त येत आणि बस मधून न उतरताच त्या पोरीना बाय बाय करून मनातल्या मनात डोळ्याने पप्पी देऊन तसेच पुढे जात. ह्या असल्या नाजूक पण स्पोठक गोष्टी आमच्या सारख्या आणि कायम एस्टी स्त्यांडच्या टपरीवर पडीक असलेल्या आमच्या मित्रांच्या नजरेतून लपत नसत.  ते सहन करण्यापालीकडचे पण असे. अशा अनेक जीन्स प्यांट बूटवाल्या पोरांना तिथेच बदडून काढण्याचे मनसुबे आम्ही कलेच्या लोकांनी बांधले होते. पण मी एक सुहृदई, प्रेमळ आणि गांधीजींच्या अहिंसेवर विश्वास ठेवणारा असल्याने ते मनसुबे तडीस नेले नाहीत.                                                      

आम्ही कलेला कवटाळले याचे कारण आम्हाला कला आवडत होती असे नाही तर तिचे नखरे कमी असत. जर्नल लिहा, सराना खुश ठेवा, ७०% हजरी लावा, म्याडमला घाबरायचे नाटक करा असले अत्याचार कला करत नव्हती. कलेची फक्त परीक्षा द्या एवढी एकंच अट असायची. त्यामुळे कमी त्रासदायक म्हणून माझे कलेवर कायम प्रेम राहिले आहे.

काल "इंजिनीर डे" च्या शुभेछा देऊन आमच्या दु:खावर डागण्या देणारे आणि  भारी भारी पोस्ट मराठीत लिहिणाऱ्या इंजीनेरामुळे दिवसभर डोक्याला शॉट बसत होते. त्यात एक पोस्ट तर आमच्या त्या काळातील एका प्रेमानेच टाकली होती.  तिच्या इंजिनीर  नवऱ्याला मिठीत घेऊन फोटो आणि वरती ट्याग लाइन "इंजिनीर मुळेच हे जग चालते".  हि पोस्ट तिने  मला ट्याग केली नसली तरी ती मलाच उद्देशून होती हे न समाजान्या इतका मी काय "हा " नाहीये. अशा खपल्या काढणारे लोक आणि लोकी यांना धडा शिकवण्यासाठी आपण साऱ्या कलेवर प्रेम करणाऱ्या कलाप्रेमी कार्यकर्त्यांनी "कला दिवस" सुद्धा साजरा करण्याचे मी आवाहन करत आहे.









Tuesday, September 15, 2015

त्या माळरानाच्या मधून वाहणाऱ्या  क्यानॉलच्या कमरेइतक्या पाण्यात उड्या मारत आणि एकमेकांच्या टांगड्या वोढत पोहणाऱ्या शिडशिडीत अंगाच्या नागड्या पोरांकडे तो किनाऱ्यावर उभा राहून बघतोय. वैशाखातले दुपारचे उन लागू नये म्हणून त्याने टोपी आणि गॉगल घातलाय. ती शिडशिडीत आणि काळ्या वैगेरे रंगाची पोरं पाण्यातून बाहेर येउन अंग शेकेल अशी माती अंगावर टाकून घेत आहेत आणि माती भाजल्यावर क्षणभर ओरडून मग अंगाला शेकणाऱ्या गर्मीचा आनंद घेऊन पुन्हा पाण्यात उडी टाकत आहेत. त्या पोरांचे त्याच्याकडे अजिबात लक्ष नाहीय. तो त्यांच्यात स्वताला शोधण्याचा प्रयत्न करतोय. त्याला कपडे काढून पाण्यात उडी मारू वाटतेय पण गेलेल्या भूतकाळातील क्षणाला किती जरी प्रयत्न केला तरी तो पकडू शकणार नाही याची त्याला भीती वाटतेय. पाणी पण जरा घानंच दिसतेय. तो पाण्यात उतरतो, ओंजळीत घेऊन तोंडावर मारतो आणि तिथंच जराश्या अंतरावर असणाऱ्या भुईमुगाच्या शेताकडे जातो. भुईमुगाच्या शेंगा काढत असताना शेतात येणारा वास त्याला खूप आवडतो. शहरात मिळणाऱ्या प्रत्येक पर्फुम मध्ये तो वास शोधत असतो. पण त्याची आवड हि पांढरपेशी नाही हे कळल्यापासून त्याने ते पर्फुम शोधायचे बंद केलंय.  बायका वेल उपटत आहेत, त्यांची लेकरं उनात त्या वेलींच्या गर्दीत मातीत काहीतरी खेळ शोधत आहेत.  नाहीतर तवलीत, जर्मनच्या डब्यात, किंवा खोल्यात करून दिलेला भाकरीचा काला चिवडत दिवस कधी मावळतोय आणि आईचे लक्ष आपल्याकडे कधी जातंय याची वाट बघत आहेत.  तो पुढे सारून एक वेल हातात घेऊन शेंगा खाऊ लागला तेवढ्यात त्याला एक माउली आपल्या जराश्या थोराड पोराला शिव्या देताना दिसली,
"ये मुडद्या कुठे फिरतोयरं जरा शेंगा तोडू लाग म्हणलं तर गोळा आलाय तुझ्या पोटात…सांगून ठीवते, काय शेंगा खायच्या असल्या तर हितंच खा, घरी गेल्यावर वाटुन आलेल्या शेंगाला हात लावशील तर मुडदाच बसवील तुझा, काय मेलं हि बी  असलाच आणि ह्याचा बाप बी असलाच, नकु करून सोडलाय जीव ह्या बाप लेकानी'. त्याने तो वेल खाली टाकला आणि घराच्या दिशेने सावकाश निघाला. 




Monday, July 13, 2015

बाहुबली





मी अपवाद वगळता हिंदी सिनेमाच्या नादाला लागत नाही. ते सरसोंदा खेत, मकाई दि रोटी, एकाच प्रकारच्या संगीतात अनेक गाणी असल्याचे भासवून नाचणारे पंजाबी वाणाचे चपाती हिरो यापेक्षा नक्कीच काहीतरी वेगळे असणार म्हणून बाहुबली हा तमिळ सिनेमा बघायला गेलो. तो मूळ तेलगु सिनेमा आहे समजल्यावर सुद्धा अजिबात अपेक्षा भंग झाला नाही. त्या मल्टीप्लेक्स मधील ५० एम एम च्या पडद्यावर ७० mm दिसणारा पहिलाच सीन येतो आणि समजते हि वेगळीच ब्रीड आहे. प्रेक्षक अगोदरच आपल्या उंचावलेल्या अपेक्षांचा डोलारा सांभाळला जाणार आहे असे समजून खुर्चीत आपले बुड हालवून मजबूत करून घेतात आणि आपल्या शेजारी कोण आलं असेल ह्याची उस्तुकता मनात ठेवत आपली जागा शोधणाऱ्या प्रेक्षकाकडे आणि ब्याटर्यांच्या उजेडाकडे दुर्लक्ष करून आपली सगळी शक्ती डोळ्यात आणून डोळे सिनेमात घालतात.

तिथून चालू होणारा अडीच तासाचा प्रवास पहिल्यापासूनच संपूच नये असे वाटत राहते. पडद्यावर दिसणाऱ्या अफाट धबधब्याच्या पाण्यामध्ये राणीने स्वताचा जीव देऊन वाचवलेले बाळ जेंव्हा त्याच पर्वतांच्या आणि धबधब्यांच्या कुशीत वाढून मोठा बाहुबली बनते तेव्हा तो शिवलिंग उचलणारा बाहुबली म्हणजे प्रभास खरा मर्द वाटतो. सहा फुट उंच, साऊथ स्टाईल दाढी, गालावर हास्य आणि गव्हाळ वर्ण. तो पूर्ण चित्रपटभर भारतीय संस्कृती खांद्यावर घेणारा आणि खऱ्या भारताचे नेतृत्व करणारा हिरो वाटत राहतो. तिथे आपल्याला त्याचे येट प्याक आहेत कि सिक्स प्याक आहेत हे बघायची गरजंच पडत नाही. त्या ईश्वरायेवढ्या पर्वतावरून फेसाळनाऱ्या अवाढव्य धबधब्यातून वरती चढू पाहणाऱ्या बाहुबलीने तुम्हाला जिंकलेले असते. पहिला अर्धा पाऊन तास बाहुबलीला जिथे जायचे आहे तिथे पोहोचवण्यासाठी खर्च केलाय पण प्रेक्षकांना अजिबात असे वाटत नाही कि कधी तो आपल्या इप्सित स्थळी पोहोचतोय आणि कधी भिड्तोय. बाहुबलीचे आपल्या इप्सित स्थळाकडे पोहोचण्यासाठी सुरु झालेले पर्वतारोहण चित्रपटाला एक वेगळीच उंची प्राप्त करून देते. कधी कधी आपल्याला जाणीव होते कि हे दृश्य मिशन इम्पोसिबल टू मध्ये बघितल्या सारखे वाटतेय पण त्यामुळे त्या दृश्याची उंची अजिबात कमी होत नाहीय किंवा कॉपी केली आहे असे म्हणण्याची इच्छा आपण दाबून टाकतो.

तम्मना भाटीया पण चांगलीच दिसलीय. एका पुरुषाचे काम आणि जोखीम अंगावर घेतलेल्या आणि आपले स्त्रीत्व लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलीला तिचे स्त्रीत्व बहाल करून देण्याचे काम जेव्हा बाहुबली करतो तेव्हा त्या नृत्य दिग्दर्शकाला सलामच करू वाटतो. “एकाच गाण्यामध्ये तिची लढावू कपडे उतरवून तिचा शृंगार करणारा आणि त्या श्रुंगाराला आपल्या बाहुपाशात घेऊन तिला अत्युच्च पातळीवर घेऊन जाणारा बाहुबली “ हे दृश चित्रपटाची उंची वाढवते.

राजघराण्यातील राजकारण, राजमहाल, कपटे, युध्द ह्या प्रत्येक गोष्टी दाखवताना दिग्दर्शकाने कुठेही कंजुषी केलेली नाही. आपण युद्धे अनेक बघितली आहेत, महाभारत पहिले आहे, ट्रोय, अलेक्झांडर, ३०० पहिला आहे. यातील युद्ध त्या युद्धाच्या भव्यातेपुढे कुठेही कमी पडत नाही. उलट अगोदर कधीही नाही पाहिलेले युद्धातील डावपेच यातील युद्धामध्ये दिसतात. तलवार युद्ध, भाला युद्ध, घोडयावर बसने, उतरणे, घोड्यावरून मारणे, हत्ती मारणे ह्या गोष्टी करताना शंभर किलोचा असलेला बाहुबली कुठेही कमी पडत नाही.

राजकुमारचे मुंडके उडवल्या नंतर काही सेकंद त्याच लईत तसेच चालत राहणारे त्याचे मुंडके विरहित धड प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावते. आता कुठे चालू झालंय असे वाटत असतानाच सिनेमा संपतो आणि अडीच तास कसे गेले तेच आपल्याला काळत नाही. आता फायनल लढाईची वाट अजून एक वर्ष बघावीच लागणार आहे.
हा चीत्रपट म्हणजे बॉलीवूडला दिलेली एक चेतावणी आहे.... Improve or perish.


Sunday, March 22, 2015

गरुड घुबड

उंचच उंच लिंबाऱ्यांच्या झाडांनी व्यापलेलि एक जुनाट दगडी चिरेबंदी विहिर आहे.  त्या विहिरीच्या कडेला लिंबाऱ्यातून  उंच वरती निघून आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवणारा पिंपळ आहे. त्या पिंपळाची आणि लिंबाऱ्यांची पाने पडून विहिरीतील पाणी झाकून गेले आहे. कधी कधी एखादी धामीन किंवा इरुळा तोंड वरती काढून आपले अस्तित्व दाखवतात. बाकी पाणी शांत असते.  विहिरीच्या पायऱ्याच्या कपारीत खालच्या बाजूने घुबड आणि घुबडिनीचे घर आहे. विहिरीच्या कडेच्या त्या उंच पिंपळावर बसून रात्रीच्या चंद्र ताऱ्यांचा आस्वाद घेण्याचे काम गेले कित्तेक दिवस घुबड आणि घुबडिन करत आहेत.  कधीतरी चांदणे दाखवायला म्हणून आपल्या पिल्लांना पण ते पिंपळाच्या झाडावर घेऊन येत असत. रात्री दोन नंतर आणि पहाटे घुबड बाहेर पडुन अन्न जमा करून घेऊन येते. पिल्लांना पण त्यांचे आई बाबा खूप आवडतात. थोडक्यात घुबड घुबडीनींचा सुखाचा संसार चालू आहे. पण गेले काही दिवस उच्चवर्णीय गरुडाच्या चकरा विहिरीच्या दिशेने वाढलेल्या आहेत हे चाणाक्ष घुबडाच्या नजरेतून सुटलेले नाही. तो जरासा अस्वस्थ आहे, पण शांत आहे.  त्याला आपल्या पिलांची पण काळजी वाटतेय. गरुडाच्या वेळी अवेळी चकरा घुबडीनिच्या पण नजरेतून सुटलेल्या नाहीत. एके दिवशी घुबड घुबडिनीला सावध करते. "सखे तो गरुड जो वेळी अवेळी चकरा मारत आहे त्यापासून सावध रहा". त्यावर घुबडिन घुबडाला  अश्वस्त  करते. "काळजी नसावी सख्याहरी, अश्या लोकांना कसे वठणीवर आणायचे हे मला चांगले ठाऊक आहे" एके दिवशी घूबड अन्न जमा करण्यासाठी गेले असता गरुड येउन पिंपळावर बसून घुबडिनीच्या घरट्याकडे बघत बसतो. घुबडिन घाबरून आपल्या पिलांना पंखाखाली घेऊन बसते. तिची नजर वारंवार गरुडाकडे जात असते. तो जात पण नाही लवकर. काही वेळाने घुबड येत असलेले पाहून गरुड उडुन जातो. घाबरलेला गरुड येउन पाहतो सगळे व्यवस्थित असते. घुबड घुबडिनीची स्तुती करतो आणि तिच्या धैर्याची तारीफ करतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा घुबड अन्न गोळा करायला जाते. आता घुबडिनीच्या मनात गरुडाच्या रूपाविषयी विचार येत आहेत. त्याची ती अनुकुचीदार आणि शाही बाक असलेली चोच, त्याची ती लकबदार मान आणि आकाशाचा वेध घेणारे डोळे, त्याची उंची, त्याचा चालतानाचा रुबाब, उडतानाचा रुबाब, खरच गरुड हा देवकुळातील असला पाहिजे. घुबडीनीच्या मनात गरुडाविषयी भावना तयार होत होती. आपली पिल्ली गरुडा सारखीच व्हावी अशी भावना घुबडिनीच्या मनात येते. काही वेळाने आजून गरुड येउन पिपळाच्या झाडावर बसतो. आता तो घुबडिनीकडे बघतोय. घुबडिन घाबरते पण पहिल्या दिवसा इतकी नाही. आज गरुड घुबड येण्याच्या अगोदरच जाते. गरुड येतो, त्याला वाटते आज पण गरुड दिसेल म्हणून त्याच्या काळजात धस्स झालेले असते. पण गरुड दिसत नाही. आनंदाने घुबड जाते, घुबडीनीला आणि पिलाला खाऊ घालते. आसे काही दिवस चालते. घुबडाला गरुड दिसत नसल्याने त्याची चिंता मिटते. नेहमीप्रमाणे गरुड येतो, आज घुबडिन त्याला घाबरत नाही. गरुडावर घुबडिनीचा विश्वास बसलेला असतो. आणि घुबडिन गरुडाची स्वप्ने पण बघू लागलेली असते. आता तिला गरुडसारखीच पिल्ले हवी असतात. ती पिलांना सोडून दरवाजात उभी राहते. गरुड तिला उद्या नदीच्या पलीकडे असलेल्या एक देवळाच्या गाभाऱ्यात यायला सांगतो. शेवटी तो असतोच देवाचे वाहन. घुबडीन खुश होते. दुसऱ्या दिवसाची वाट बघू लागते. घुबड जेवण घेऊन येते पण तिची भूक मेलेली असते. ती उद्याच्या गरुडाबरोबरच्या भेटीची स्वप्ने बघण्यात दंग असते. दुसऱ्या दिवशी घुबड नेहमी प्रमाणे अन्न शोधण्या जाते. घाई झालेली घुबडिन अगोदरच देवळाकडे पळते. नदी वोलांडून, डोंगराच्या माथ्यावर असलेले ते पडीक आणि एकाकी देवूळ पौर्णिमेच्या चांदण्यात सुंदर दिसत असते. घुबडिन वाट बघत बसते. चंद्र उतरणीला लागतो तरी गरुड येत नाही. देवळाच्या त्या पडक्या पण सुंदर भिंतीवर बसून वाट बघून व्याकूळ झालेली घुबडिन निराश होऊन घराकडे निघते. घरी जाउन बघते तर एकही पिल्लू नसते. काही पिल्लांची पिसे आणि थोडेसे रक्त पडलेले असते. ते पाहून निराश झालेली घुबडिन तशीच बसून राहते. आता घुबडाला काय सांगावे म्हणून ती घाबरून तर गेलेलीच असते पण तिची पिल्ले पण गेली म्हणून दु;खी पण असते. घुबड येते. घरट्यात पाहते, त्याला कळते काय झालेय. घुबड म्हणतो, जाऊदे सखे, तू त्या गरुडाचा मुकाबला करू शकणार नव्हतीस, ह्यात तुझा काही दोष नाही, आपण आजून पिल्लांची निर्मिती करू. पण आता आपण घर बदलायला पाहिजे. आपल्याला पुनर्निर्मिती गरुडासाठी नाही करायची. घे दोन घास खाउन घे.









Monday, March 16, 2015

सौदा

तुटक वाहतूक असलेल्या डांबरी सडकंच्या कडेला एका रोगट वडाच्या झाडाखाली चहाचे हॉटेल म्हणावे अशी टपरी.  ह्या टपरी समोर ज्याला बाकडा म्हणू शकू अशी एक फळी एका बाजूने दगडावर आणि दुसऱ्या बाजूने वाकड्या तिकड्या लाकडावर टेकवली आहे.  त्या टपरीच्या मागेच चार पत्रे टाकून केलेली अजून एक टपरी आहे.  त्यात एक टोपीवाला माणूस कुणाला तरी उधार मिळणार नाही म्हणून शिव्या देतोय. त्या टपरीला लटकवलेले पोतं कवाडाचे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. जरा वेळाने आतला आवाज बंद झाला. सौदा बाहेर येउन त्या बाकड्यावर बसला. त्याने नळी सारखी झालेली प्यांट घातली आहे आणि त्याच्या एकावर एक पडलेल्या मांड्या लाकडासारख्या दिसत आहेत. त्याच्या तोंडावर अपमानाची कसलीही छटा नाहीये. थोडक्यात त्याच्या तोंडावर कसलेच भाव नाहीत. थोडेसे पांढरे केस, सुकलेला चेहरा आणि दाढीचे पांढरे काळे खुंट. त्याच्या कानावर बसलेली माशी उठवायची त्याला गरज वाटत नाही. त्याला आज दारू उधार मिळालेली नाही. तो तिथल्या चहा पिणाऱ्या लोकांकडे आणि रस्त्यावरून तुरळक जाणाऱ्या सायकली आणि वाहनाकडे बघत बसला आहे. काही तासने तो कंटाळून घराकडे चालू लागतो. त्याच्या त्या चाळीतील दोन खोल्यांच्या घरात त्याची बायको त्याची वाट बघत बसलेली आहे. तो जाऊन तिच्या मागे उभा राहतो. ती काहीच बोलत नाही. सौदा आशाळभूत पणे तिच्या खांद्यावर हात टाकतो.  ती लगेच हात झटकून म्हणते, "पुन्हा जर अंगावर हात टाकला तर चपलंच हानीन तोंडावर" सौदा लांब जाऊन लोखंडी पलंगावर बसतो.

"आरं आयघाल्या पोरगं तापानं फणफनलंय आणि तू कुठं गु खात फिरतोय रं ?" त्यांचा दहा वर्षाचा मुलगा झोपला आहे. त्याच्या अंगात भयंकर ताप आहे.
"चल कि त्याला घेऊन सरकारी दवाखान्यात, सायकल वर न्हेतो मी !"
"रयवारी तुझ्या बापाने सरकारी दवाखाना उघडा ठिवला होता का ?"

आता सौदा गप बसतो. त्याच्याकडे इलाज नसतो. तो साखर कामगार आहे आणि त्याच्या कारखान्याने गेले दहा महिने कामगारांची पगार दिलेली नाही. तेवढ्यात बाहेर TVS सुझुकीचा आवाज येतो. आण्णा आत येतात. त्यांना आत यायला सौदा जागा देतो.  भारदस्त व्यक्तीमत्वाचे आण्णा सौदाला तुछ पणे  ऑर्डर देतात, "बघतो काय सौद्या, उचल पोराला, आन बस माझ्या मागे गाडीवर" असे बोलताना अन्नाची नजर सौदाच्या बायकोवर असते. सौदा पोराला उचलून बाहेर निघतो. त्याच्या पाठीमागे आण्णा निघतात आणि निघताना वळुन सौदाच्या बायकोकडे एक नजर टाकतात. ती त्यांच्याकडेच बघत असते. सौदा त्यांच्या मागे बसून गुपचूप दवाखान्यात जातो.  ते मुलाला दवाखान्यात दाखवून येतात. सौदा मुलाला त्या लोखंडी पलंगावर झोपवतो आणि कडेला गुपचूप उभा राहतो. काही क्षण शांत जातात. सौदा, सौदाची बायको आणि आण्णा. वैतागलेले आण्णा सौदाला विसची नोट त्याच्याकडे देतात. सौदा तडक घराबाहेर पडतो. त्याची बायको आतून दरवाजा लावून घेते. आता सौदा त्या वीस रुपयाची भरपूर दारू पिवून पुन्हा त्याच बाकड्यावर बसून काय विचार करत असेल त्यालाच ठाऊक.
















Friday, March 13, 2015

भांडवलाला जात नसते,धर्म नसतो, भाषा नसते आणि सीमा सुद्धा नसते. भांडवल फक्त भांडवल असतेभांडवलदारांचा उद्देश हा फक्त नफा कमावणेच असतो . त्यासाठी कोणतीही  साधन सुचीता पाळली जात नाही. कुणी भांडवलदार किंवा भांडवलदाराचा दलाल जर म्हणत असेल कि मी ह्या देशाचा, इथल्या जनतेचा विकास व्हावा म्हणून गुंतवणुक करत आहे तर तो लोकांना मुर्खात काढत आहे. कारण गुंतवणूक फक्त भांडवलाची होत असते आणि कमावलेला नफा त्या गुंतवणुकीच्या फक्त बोटावर मोजण्या एवढ्या भांडवलदारांच्या खिशात जात असतो. म्हणजे कामगार आणि सरकार हे दिवसरात्र भांडवलादारांना अजून जास्त आणि अजून जास्त श्रीमंत होण्यासाठी काम करत असतात. जेव्हा आपण पाहतो कि गुजरातला एकदमच काही कंपन्यांनी आपले चंबू गबाळ हलवले आहे, तेव्हा त्यांना गुजरातचा विकास करायचा नसतो तर तिथल्या सरकारकडून जास्तीत जास्त सवलती घेऊन आपल्या नफ्यात प्रचंड वाढ करून घ्यायची असते. त्यामुळे मग राज्या राज्या मध्ये स्पर्धा लागते आणि कोण जास्त सवलती देतंय याची वाट बघत हे भांडवलदार बसतात. नुकसान होते सामान्य लोकांचे कारण सामान्य लोकाकडून प्रचंड कर घेणारे सरकार ह्या भांडवलादारांना फक्त करच माफ करत नाही तर वीज, शेतजमीन कवडीमोल भावात देते.  हे लोक इतके ताकतवर असतात कि सरकार कडून कामगारांचे शोषण कसे करता येईल असे कायदे करून घेतात. जनतेला वाटत असते सरकारची धोरणे हि विधिमनडळात ठरतात. पण ते खोटे असते. आज जगामध्ये बहुत करून सर्व राष्ट्रात सरकारची धोरणे हे भांडवलदारांच्या बोर्ड रुम मध्ये ठरतात. आपल्या हातातील, माध्यमांचा वापर लोकांची मते बनवण्यासाठी किंवा आपल्याला हवी तशी बदलवण्यासाठी करत असतात. ज्यांचा ब्यांकावर ताबा ते सर्वसत्ताधीश. हे समजून घेतले कि मग खरे सत्ताधीश कोण असतील यावर वादविवाद होणार नाही. सरकार फक्त राष्ट्रपतींचे काम करते. शिक्का मारते.  तर मग एक सरकार बदलून दुसरे सरकार आणण्यासाठी हे भांडवलदार का प्रयत्न करतात? सरकार जेव्हा आपली ताकत दाखवायला लागते तेव्हा तसे होते. त्यामुळे जेव्हा भांडवलदार एकत्र येउन एखाद्या नेत्याला सर्वोच्च देशाच्या सर्वोच्च पदावर बसवतात तेव्हा त्यांना त्याच्याकडून हवा तो परतावा मिळवण्याची सोय केलेली असते. भारत हे अजून पूर्ण भांडवलशाही राष्ट्र झालेले नाही. घटनेत तर किमान अजून "समजवादी" शब्द टिकून आहे. तो अजून किती दिवस राहील सांगता येत नाही. पण भारतात मोदीला सत्तेवर अनन्यासाठी जेवढे कष्ट ह्या भांडवलदार वर्गाने घेतले आहेत ते बघता समाजवादी शब्द घटनेतुन कधी गपकन गळून पडेल समजणार पण नाही. जनतेच्या मनात भांडवलशाही विषयी प्रेम आणि "विकास" ह्या शब्दाचे संमोहन तयार करायला त्यांच्याच हातात असलेली प्रसारमाध्यमे आहेतंच. मग आज "पुरोगामी " ह्या शब्दाला बदनाम करण्यासाठी यशस्वी ठरलेले हे लोक "समजवादी, साम्यवादी" ह्या शब्दांना पण बदनाम करण्यात यशस्वी ठरतात.   भांडवलशाहीचे आवडते अपत्य असलेल्या दहाईक कोटि उच्च मध्यामवर्गीयांच्या जीवनाचे मृगजळ दाखवून बाकी शंभर कोटि लोकांना आर्थिक गुलाम बनवणे हेच ह्या भांडवदरांचे ध्येय असते. लोकांना वाटत आहे मोदी सरकार हे Pro Industry आहे पण त्यांना हळु हळु कळून चुकेल कि मोदी सरकार Pro Industrialist सरकार आहे. निवडून येताच कंपन्यावरिल कर कमी करणे, जमीन अधिग्रहण कायदा आणणे. हे म्हणजे असे आहे कि वाटच बघत होते निवडणूक निकालाची. निवडुन आले कि आगोदर आपल्या धन्याचे भले करणारे कायदे आणले.  शेतीला उद्योगाचा दर्जा देऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उचावाले गेले पाहिजे हि घोषणा मोदी सरकारकडून लवकरच होईल अशी अपेक्षा करतो. मग हळु हळु शेतकऱ्यांना शेती परवडत नाही त्यांनी शेती मोठ्या मोठ्या उद्योजकांना देऊन ती अधुकीन पद्धतीने करावी व त्या शेतात नोकरी करावी. म्हणजे शेतकर्यांना नोकरी पण मिळेल आणि भारत जगातील सर्वात जास्त अन्नधान्य उत्पन्न करणारे राष्ट्र होईल. हा प्रस्ताव आज किंवा उद्या येणारंच आहे. शेतकऱ्यांनी फक्त वाट बघावी त्या अछ्या दिनाची. त्याच्या समर्थनार्थ वृत्तपत्रातून वैचारिक संपादकीय पदावण्यासाठी आहेतंच आपले संपादक घोड्यावर बसून. रिलायंस, टाटा, बाटा, विप्रो, कोका कोला किंवा तत्सम कंपन्या भारतासारख्या १३० कोटि जनतेला विकासीत आणि श्रीमंत करू शकतील यावर भरोसा ठेवून एका खांद्यावर विकासाची आणि दुसऱ्या खांद्यावर भगवी पताका अंगावर घेऊन फिरणाऱ्या तरुण पिढीला जेव्हा खरा हिसका बसेन तेव्हा उशीर झालेला असेल. 




Sunday, March 8, 2015

चिंतनीय येडझवेपण

हळु हळु मी येडझवा आहे यावर शिक्कामोर्तब होत आहे.  मग आजपर्यंत लोक मला येडझवा समजत नव्हते का? तर समजत होते, पण समोर बोलून दाखवत नव्हते. कारण येडझवा असणे आणि त्यावर शिक्कामोर्तब होणे यामध्ये एक विंडो पिरीयड असतो तो संपला नव्हता. अधिकृत येडझवा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी तुम्हाला काही पात्रता पूर्ण कराव्या लागतात.  काही वर्षापूर्वीच येडझवा असण्याची काही लक्षणे मला जवळचा  समजत असलेल्या लोकांना माझ्यात दिसायला चालू झाली असावीत. जेव्हा मी आणि माझे मित्र गावातील देवाच्या जत्रेत दिवसभर फिरलो, नायकीनीवर पैसे उधळले, पाळण्यात बसलो, बर्फाचे गोळे घेऊन एकमेकांच्या डोक्यात फोडले आणि बाकी मित्र देवाच्या दर्शनाला देवळात गेले तेव्हा मी बाहेरच्या मटणाच्या खानावळीत गेलो. मटणाच्या खानावळीत जाणे विशेष नव्हते पण जत्रेला जाउन देवाचे दर्शन न करणे आणि वरून मटन चोपणे हे म्हणजे पाप होते. आता माझ्या सात पिढ्या नरकात जाणार ह्या नजरेने अगोदर दोस्तांनी आणि नंतर गाववाल्यांनी भविष्य वर्तवायला चालू केले. तसे माझ्याविषयी भविष्य वर्तविणे हा माझ्या जवळच्या आणि लांबून जवळच्या लोकांचा आवडता उद्योग होता आणि आहे. तर आपल्याविषयी चर्चा चालू होणे हे एक महत्वाचे येड्झवेपणाचे लक्षण आहे. त्यामुळे त्यानंतर हळु हळु सिजनड येड्झवा बनण्याच्या मार्गाने आपला प्रवास चालू झाला असावा. तर हे येड्झवेपणा किंवा येड्झवे आसने म्हणजे काय ? तर यावर अजून एकमत झालेले नाही. उदाहरणार्थ जेव्हा पहिल्यांदा जत्रेला जाउन देवळात गेलो नाही म्हणून माझ्या लोकांनी मला येड्झव्यात काढले तेव्हा ते जाउन दगडाच्या पाया पडणार आणि खुशहाल राहूदे अशी दगडाला मागणी करून   समाधाणाने घरी परतणार म्हणून मी पण त्यांना येड्झव्यात काढल्याचे आठवते. पण मीच खरा येडझवा आहे हे त्यांनी बहुमताने सिद्ध केले. तर बहुमत हे मूर्खपणाचे लक्षण आहे असा तेव्हापासून झालेला समज आजून कायम आहे. सामाजिक आणि जैवीन नियमाप्रमाणे हा येड्झवेपणाचा रोग बळाउ लागला आहे. रोगाच्या ह्या पायरीवर बाकी समाज आपल्याला येडझवा वाटू लागतो आणि समाजाला आपण येड्झवे असल्याची खात्री पटलेली असते. तर थोडक्यात माझ्या येडझवेपणाचा विंडो पिरियड संपून आता मी संपूर्ण येडझवा झालो आहे  असे प्रमाणपत्र परवा वडिलांनीच दिले. मी आपल्या नवीन घराची वास्तू शांती करणार नाही असे ठामपणे सांगितले आणि वडिलांनी ते प्रमाणपत्र बहाल केले. तर आता वडिलांनी बहाल केलेल्या प्रमाणपत्रावर बाकीचे नातेवाईक आनंदाने सही वैगेरे करतील यावर माझा तंतोतंत विश्वास आहे. पण मला अजून येडझवेपणाच्या अत्युच्च पातळीवर पोचण्यात यश आलेले नसल्याने वडील पण त्याच समाजाचा भाग असले तरी माझ्यात त्यांना येडझवा म्हणण्याची ताकत आलेली नाही.  कारण बाकी सगळी सांस्कृतिक, धार्मिक, पारंपारिक बंधणे झुगारली असली तरी आपले नातेवाईक, आई, वडील, भावंडे सोडून बाकी सगळा समाज मूर्ख असतो हा संस्कार झुगारण्याच्या अत्युच्च पातळीचा य़ेडझवेपणा अजून आत्मसात करणे बाकी आहे.

तर आता मला शहाणं म्हणून घ्यायचं असेल तर त्यांच्यात मिसळायला हवे. ते काय चांगले काय वाईट ठरवतील ते निमुटपणे सहन करून "होयबा" व्हायला हवं. पण मला यांच्याकडून शहाणे म्हणून घ्यायची इछ्या अजिबात नाही. कारण चिंतनाने मिळवलेले हे एडझवे पण घालवणे आता माझ्या पण हातात नाही. कारण खरी गोष्ट फक्त मलाच माहित आहे. म्हणजे लोक भित्रे असतात, त्यांच्याकडे एकटे उभा राहण्याची ताकत नसते हे अंतिम सत्य आहे. ह्या भीतीतून मग धर्म, पक्ष, वेगवेगळ्या संघटना, मित्रमंडळे, ग्रुप किंवा टोळकी स्थापन होतात. मग कधी आपण जन्मताच एखाद्या टोळक्याचा भाग असतो  किंवा स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी अश्या टोळक्यात सामिल होतो. एकदा का अश्या टोळक्यात सामील झालो कि मग आपले स्वतंत्रपणे विचार करण्याची कुवत नष्ट होते. थोडक्यात आपली किमत शुन्य होते. आणि मग मेंढराप्रमाणे त्या टोळक्याचे जे विचार असतील ते आपल्याला मान्यच करावे लागतात, नाहीतर आपली येड्झवे म्हणून टोळक्यातून हकालपट्टी होऊ शकते. अश्या वेळी टोळक्याला आणि टोळक्याच्या म्होरक्याला पण माहित नसते कि ते सगळेच गुलाम आहेत. तर एकूणच मला अश्या गुलामांच्या टोळक्यात सामील व्हायचे नसल्याने माझ्या येड्झवेपनाला काहीच ईलाज नाही या मतावर मी येउन पोचलो आहे.   त्यामुळे मी या शहाण्या माणसापासून दूर राहण्याचे ठरवले आहे.   आता मी येडझवेपनाच्या अशा पायरीवर येउन पोहचलो असल्याने येड्झवेपणावरच्या माझ्या चिंतनातून पुढे आलेले येडझवेपणाचे खालील दोन प्रकार आढळतात -

१. अकस्मात येडझवेपण  - या प्रकारे आपल्याला एकदमच सगळे येडझवे वाटू लागतात. "त्यांच्या" प्रत्येक गोष्टीचे तुम्हाला हसू येते. तुम्हाला  दया येते. आणि तुम्ही 'त्या" येडझवयांच्या नादी लागायचे नाही म्हणून सगळ्या अस्तित्वातील कळपातून एकदमच बाहेर पडुन एकटेच आयुष्च्याचा आनंद लुटू लागता.
२. चिंतनीय येडझवेपण - या प्रकारे आपल्याला हळु हळु गोष्टी उमजू लागतात, उमगू लागतात. मग सावकाश तुम्ही कुणाला नाराज न करता मूर्खांच्या गर्दीतून बाहेर निघू लागता. त्यावेळी बाकी लोक म्हणतात, "तो बराय, पण कधी कधी येडझव्यासारखा वागतो"  हा तुमचा विंडो पिरियड असतो. मग हळु हळु एकदिवस तुम्ही संपूर्ण येड्झवे पण प्राप्त करता. यावेळी आपले आई, वडिल, बायका, पोरं पण आपल्याला येडझवा म्हणू लागतात. त्यावेळी आपण मानवी बुद्धिमत्तेच्या आणि चिंतनाच्या अत्युच्य पातळीवर तरंगत असता. तेच आयुष्याचे यश असते. सगळ्यांना ती अवस्था प्राप्त करणे महाकठीण.


























Tuesday, February 24, 2015

माझ्या डायरीतील भाग

दिनांक : १३/०१/१९६२
काल सुर्षा कुठल्यातरी पेठेतल्या वाड्यात कसल्या तरी पुस्तकाच्या प्रकाशनाला घेऊन गेला. ह्या सुर्शाला असले लोक कुठे सापडतात कुणास ठाऊक. पुस्तक प्रकाशने, चित्र प्रदर्शने, फोटो प्रदर्शने बघत रिकामा खिसा घेऊन गावभर हिंडत असतो. आणि रात्री येउन माझ्या सिगारेटी संपवतो. हे म्हणजे उदाहरणार्थ थोरंच. आज त्याला मीपण सापडलो. दोन तास त्या बाकड्यावर बसून मी वाड्याच्या भिंतीवर टांगलेल्या लोकांचे फोटो बघून त्यांची नावे वाचत होतो. हे सगळे थोर महामहीम होते म्हणे आणि त्यांनी पुण्याच्या संस्कृतीचा भार खांद्यावर घेऊन त्यात आजून भर घालण्याचे काम केल्याचे पण कळले. आता तिथे त्या टेबलामागे बसलेल्या लोकांनी तो भार स्वताच्या खांद्यावर घेतला असावा. तिथे गोळा झालेले सगळेच लोक गोरे होते. बायका सुद्धा आल्या होत्या. बायका सुद्धा गोऱ्याच होत्या. त्या खूप नटुन वैगेरे आल्या होत्या आणि त्यांचे केस मोकळेच होते. तिथल्या बायका आणि पुरुषांचे पण व्होट येवढे लाल कसे कुणास ठाऊक. आपल्या गावातील बायकांचे व्होट लाल कसे काय नसावेत. हे म्हणजे भलतेच. पण ते खूप शुद्ध मराठी म्हणजे आपल्या शाळेतील पुस्तकातील धड्यात आसते तशी मराठी बोलत होते. "प्रचंड" वैगेरे शब्द बोलताना सुद्धा वापरणे म्हणजे थोरंच. टेबलामागे बसलेले लोक एकोड एकोड करून भाषण देत होते. ते सगळे लोकांना माहित असलेलंच बोलत असावेत तरी पण लोक शांतपणे ऐकत होते. अधून मधून इंग्रजी बोलून इंग्रजी लोकांची उदाहरणे दिल्यावर बाकी लोक टाळ्या वाजवत. बायका सुद्धा टाळ्या वाजवत. वरती टेबला मागे बसलेल्या चार लोकामध्ये एक काळा सावळा माणूस पण होता. ते पण महामहीम असावेत. पण ते बाकीच्या महामहीम सारखे दिसत नव्हते. त्यांना यंदाच्या अखिल ब्रह्मांड मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केले आहे म्हणे. ते पण बोलले. आता पुण्याच्या संस्कृतीचा झेंडा त्यांचा खांद्यावर दिल्याने ती संस्कृती पुण्याबाहेर जाउन गावोगाव पसरेल अशी ह्या गोऱ्या लोकांना अपेक्षा असावी. गोरे लोक थोर असले पाहिजेत. त्यांना कळते कधी काय करावे. पण मला उगीच मधेच सिगारेटची तलप झाली. बाहेर उठुन जावे म्हटलं तर माझ्या उजवीकडे बसलेल्या बायकांनी माझ्याकडे तुछ नजरेने बघितले, मी तसाच वाट बघत बसलो.

सुर्शा त्यांच्यात शोभून दिसतो. कार्यक्रम झाल्यावर लोक त्याला पण बोलत होते. तो त्यांना वोळख असल्याचे दाखवत होता, लोक त्याला वोळख असल्याचे दाखवत होते.  एका विदुषीने त्याला "आणि तुझे ते आकाशवानितले काका कसे आहेत?"  असे पण विचारले . सुर्षा मोठ असला पाहिजे. काही इतर बायकांनी पण त्याच्याशी हात मिळविला.  पण माझ्याकडे कुणीच बघितले नाही. आपण म्हणजे पुण्यात शोभत नाही. चला  आता झोपून घ्यावे, नाहीतर सुर्षा येइलच सिगारेट मागायला.

दिनांक : १४/०१/१९६२
झोपेतून उठलो. पुन्हा झोपलो.

दिनांक : १५/०१/१९६२
कॉलेजमधल्या मुली सगळ्या मूर्ख आहेत.
दिनांक : १५/०१/१९६२
आज रविवार होता.


Friday, January 9, 2015

जगण्यात काही अर्थ नसतो, तसा मरण्यात पण काही अर्थ वैगेरे नसावा

जगण्यात काही अर्थ नसतो, तसा मरण्यात पण काही अर्थ वैगेरे नसावा. पण जगण्यासाठी आपलं जनगोत सोडुन परमुलखात दिवस काढायचं. हे एक भयाण दु:ख. आपला मुलुख आपल्याला दोन वेळचे अन्न पुरवायला असमर्थ आहे कि आपल्यालाच काहीतरी जास्त करून दाखवायची खाज हेच अजून तुला समजलेले नाही. नाहीतर दोन वेळच्या भाकरीसाठी तू स्वत:चा देश, संस्कृती, मानसं सोडुन इथं बारा-बारा तास काम करत खितपत पडला नसता. रात्री झोपताना पोराची आठवण आली कि त्याचा फोटो काढून बघत बसायचं आणि बायकोची आठवण आली कि तिचा फोटो बघत तळमळायचं. आपला रूम पार्टनर तरी काय आणि आपण तरी काय, एकंच. वेळी अवेळी बाथरुमला जातो. ह्या संध्याकाळला आपल्या गावात असतो तर रम्य वैगेरे संध्याकाळ म्हणालो असतो का? छे! संध्याकाळ येउन गेलेली पण कळली नसती. इथला सूर्यास्त मात्र रम्य न वाटता उदास वाटत आहे. ह्या डोंगराच्या माथ्यावर बसून सारे शहर तुझ्या नजरेच्या टप्प्यात आहे. शहरातून, ट्राफिक, लोकांची गर्दी, बागेत खेळणारी पोरे आणि ह्या सगळ्यांचा मिळुन तयार झालेला गोंगाट. पण ह्या गोंगाटातील तुझ्या हक्काचा असा एक पण आवाज नाही.  ह्या शहरातील लोक आनंदी असतील, दु:ख्खी असतील पण त्यांचा आनंद आणि दु:ख एकटे नाही ह्याचे किती समाधान असेल त्यांना. समाधान असेल कि त्या समाधानाची त्यांना जाणीवच नसेल? कारण एकटेपणा आल्याशिवाय त्याची जाणीव होत नाही. आणि हा तर परमुलखातील एकटेपणा ! ह्या लाखो श्रीमंत/गरीब लोकांच्या शहरावरती सुर्य मावळताना कुणी घरी निघालंय, कुणी मुलांना घेऊन बागेत चाललंय, कुणी ओफ़िस मधून कंटाळून घरी पोहचून सुद्धा आपल्या मुलाला, बायकोला घेऊन हॉटेल मध्ये, बागेत फिरायला घेऊन जात आहेत. आणि ह्या लाखोच्या गर्दीत आपले काहीच नाही. काहीच म्हणजे काहीच नाही. आपण  घेतोय ती हवा सुद्धा परकीच वाटतेय. उसनीच घेतोय आपण,  हि हवा सुद्धा. ह्यांचे देव, ह्यांची भाषा, ह्यांचे खेळ, ह्यांचे जेवण सगळे सगळे परके आहे. आणि आपण इथं जगण्यासाठी आलो आहोत. जगण्यासाठी कि जगवण्यासाठी ? बहुतेक जगवण्यासाठी म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. तेवढ्यात एकटीच जळत असलेली सिगारेट जळून त्याच्या बोटाला चटका बसला आणि तो भानावर आला. .................................................. .................................................. …………………….









Friday, January 2, 2015

धर्म आणि राजकारण

धर्म आणि राजकारण ह्यात मी जास्त नाही तर काहीच फरक करत नाही. तर प्रश्न उरतो, तालिबान्यांचा धर्म आणि पाकिस्तानी लोकांचा धर्म वेगळा आहे का ? तर उत्तर आहे "हो वेगळा आहे " . आमचाच धर्म खरा चे पुढचे पाऊल असते आम्ही म्हणतो तोच धर्म खरा. आणि ह्यामध्ये लपलेली असते सत्ता. कारण कोणताही धर्म हि वैयक्तिक गोष्ट कधीच नसते. ती सामुहिक गोष्ट असते. आणि जिथे समूह येतो तिथे राजकारण आणि सत्ताकारण आलेच पाहिजे. मानवी इतिहासात राजकारण आणि सत्ताकारण युद्धाशिवाय शक्य झालेले नाही.
कमजोर शत्रू जास्त धोकादायक असतो. एकदा युद्ध म्हटल्यानंतर त्यामध्ये कायदे, विधिनिषेध, दया, माया ह्याची अपेक्षा ठेवू नये.

आमच्या कुटुंबाना पाकिस्तान सरकार नाहक त्रास देत असल्याने आम्हाला ते पाउल उचलावे लागले हा तालिबान्यांचा युक्तिवाद. त्यांना हा युक्तिवाद करण्याची गरज पडली कारण पाकिस्तानी कट्टर मुस्लिम जनतेच्या पाठिंब्याची गरज त्यांना पण आहे. कोणतेही युद्ध फक्त देशाचे किंवा अतिरेक्यांचे नसते तर ते जनतेचे असते. अतिरेक्यांच्या बाबतीत त्यांना छुपा वा उघड पाठींबा असणाऱ्या जनतेचे असते. तसे नसते तर तालिबान्यांना युक्तिवाद करण्याची गरज पण पडली नसती. खलीस्तानचा लढा अयशस्वी करण्यात तत्कालीन भारत सरकार (इंदिरा गांधी ) ह्यांची एक उपाय योजना खूप कामी आली होती. जे कुणी अतिरेकी झाले आहेत किंवा गायब झाले आहेत त्यांच्या कुटुंबाना अटक केले जायचे किंवा त्रास दिला जायचा. जेणेकरून अतिरेकी कौटुंबिक आघाडीवर हारून हत्यार टाकून पुन्हा "देशप्रेमी" बनतील . हा उपाय कामी पण आला होता. पण खलिस्तानी आणि तालीबाण्यात मुलभूत फरक असावा. उद्या तालिबानी "अल्लाच्या मर्जीनेच मानवी जातीच्या कल्याणासाठी आम्हाला ते काम करावे लागले" असे सुद्धा म्हणतील. मी असल्या गोष्टीचा निषेध वैगेरे करत नाही. कारण त्यामुळे काहीच फारक पडत नसतो. ह्या गोष्टी घडत आल्या आहेत आणि पुढे पण घडत राहतील. आपण फक्त कामी आलेल्या मुलासाठी अन त्यांच्या पलकासांठी हळहळ व्यक्त करू शकतो. शेवटी प्रत्येक जीवाने न्यायाची अपेक्षा करायला ह्या जगाची उत्पत्ती काय न्याय तत्वावर झालेली नाही.