Saturday, November 30, 2013

मुलाखत 1

महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रतीबिम्बित्व उमटवण्याचा प्रयत्न  ह्या  काल्पनिक मुलाखतीच्या माध्यमातून
---------------------------------------------------------------------------------------------------------

मुलाखतीचे ठिकाण :महाराष्ट्रातील अनेक साहेबांपैकी एका साहेबांच्या शेतातील बंगला.
मुलाखत देणारे : राणारणजितराव सयाजीराव घोरपडे पाटील
मुलाखत घेणारी : मृदुला कुलकर्णी - बापट 

मृ. कु. बा.: तर राणारणजितजि………………। 
(पाठीमागून घोगरा पण जबराट आवाज) , "मालक म्हणत्यात, मालकास्नी सगळी लोकं मालकच म्हणत्यात"

मृ. कु. बा: (मागून येणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष्य करून ) तर रानारणजितजि, आपल्याला सव्वीसाव्या वर्षीच आमदार होण्याचे भाग्य लाभले, त्याबद्दल अभिनन्दन.

रा. घो. पा.: हे बघा तुमचं नाव कायाय ? मृदुला ? हं ! मृदुला, माझ्या रक्तातच राजकारण आहे. म्हणजे आमचे पणजोबा हे राजकारणात होते आणि आधुनिक महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे खूपच मोठे योगदान आहे. तसेच आमचे आजोळ हे मराठवाड्यातल्या देशमुख घराण्यातलेच. तिकडचे आजोबा पण राजकारणात होते आणि त्यांचे पण महाराष्ट्राच्या विकासात आणि इतिहासात मोठे योगदान आहे.

मजी बगा , राजकारणाचे बाळकडू मला लहानपणापासून दोन्हीकडून मिळाले. आजोबा दहा वर्ष आमदार होते, वडिल गेले पंचेवीस वर्ष आमदार आणि मंत्री असल्यामुळे राज्यकारभार कसा चालतो हे मी जवळून बघितले आहे. अगदी मोठ्या साहेबापासून ते थोरल्या काकापर्यंत आणि दिल्लीच्या म्याडमचे सुद्धा, सगळ्यांचे आशीर्वाद मला बालपणीच मिळाले.

मृ. कु. बा: वेगळ्या वेगळ्या पक्ष्याच्या सर्वोच्च नेत्याचे तुम्हाला आशीर्वाद मिळालेत तर ?

रा. घो. पा.: तर! हे बघा महाराष्ट्राच्या राजकारणात एक परंपरा आहे विरोध  फकस्त राजकारणात, बाकी सगळे दोस्तच आहेत. आणि आमच्या वडिलांचे विरोधी पक्ष्याशी पण कायम सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत.

मृ. कु. बा: वरच्या पातळीवर तुम्ही आणि विरोधी पक्ष्याचे मैत्रीचे संबंध असतात आणि जमिनीवरच्या कार्यकर्त्याला एकमेकाची डोकी फोडायला लावता असा आरोप होतो तुमच्यावर?

रा. घो. पा.: ते खोटय. साफ खोटंय. we are means, असे बघा कि आमचा फुले शाहू आंबेडकरांना मानणारा  पुरोगामी पक्ष्य आहे आणि साहेबांनी परवाच दिल्लीवरून सांगितले आहे कि विचारांची लढाई विचारांनीच लढा.

मृ. कु. बा: आता आमदार झाल्या नंतर तुमचे पुढचे ध्येय काय आहे?

रा. घो. पा: साहेबांनी स्वतः सांगितलंय निट काम कर, पुढच्या टर्मला सहकार नायतर महसुल तुझ्याकडंच. तुमी आमचे काम तर बघा ना! झेडपी, पंचायत समिती. ग्रामपंचायती, सोसायट्या, ब्यांका, कारखाने सगळे आमच्याकडच आहे. झालंचतर सूतगिरणी, शेतकरी खरेदी विक्री संघ, शेतकरी सहकारी बाझार. सगळे आहे आमच्या मतदारसंघात.

मृ. कु. बा: पण लोक तर म्हणतात कि तुमची घराणेशाही आहे , आणि प्रत्येक ठिकाणी तुमच्या  घरातील मंडळी किंवा नातेवायाकांचीच वर्णी लागते?

रा. घो. पा.: कोण म्हणतंय नाव सांगता का त्याचं ?

मृ. कु. बा: म्हणजे विरोधक असे म्हणतात!

रा. घो. पा.: कोण विरोधक ? जिह्यात तर आम्हाला विरोधकच न्हाय ? मुंबाय पुण्याच्या लोकांनी आमचा नाद करुनी हेच मी तुमच्या मार्फत अजून सांगतो त्यांना.

मृ. कु. बा:  तर दर्शकहो हे होते अमेरिकेहून आधुनिक शेतीचे शिक्षण घेवून सुद्धा महाराष्टाच्या सेवेसाठी परत येवून सव्वीसाव्या वर्षी आमदार झालेले आजच्या तरुणांचे आदर्श नेत्रुत्व.






Tuesday, November 26, 2013

शंभर वर्ष जगणे

परवा आज्जी वारली. गावातील लोक म्हणत होते "शंभर वर्ष्याची तर आसलंच म्हातारी, आता तिच्या सिनंचं कोणंच न्हाय गावात". होय बघितले असतील तिने शंभर पावसाळे. सत्तावीस वर्षा पूर्वीची मला आठवते तेव्हा पण ती तितकीच म्हातारी वाटायची. तरीसुद्धा रानात आम्हाला चालत घेवून जायची, कधी कधी कडेवर बसण्यासाठी माझी आणि चुलत भावाची भांडणे व्हायची म्हणून ती दोघांना पण घ्यायची. तिच्या त्या लाकुड्तोड्याच्या  आणि चांदणी  महालाच्या गोष्टी अजून जश्याच्या तश्या आठवतात. रानातल्या घरात विहिरीशेजारी खाली चवाळं अंथरून आणि गोधडी माने पर्यंत घेवून चांदण्या कडे बघत बघत तिच्या गोष्टी ऐकत झोपणे आणि त्या गोष्टीत स्वताला शोधणे. नंतर किती तरी वर्ष तिच्या गोष्टीतला लाकुडतोड्या जो राजकन्येला पळवून आणतो तो मीच आहे असे भास व्हायचे आणि मी तसेच वागायचे. तरुणपणी तिने केलेल्या वर्णनाप्रमाणे राजकन्या शोधण्याचा प्रयत्न केल्याचे पण आठवते. आज्जीच्या आणि लहानपणीच्या कित्येक आठवणी मला खूप सतावतात. आत्ताच.  मग शंभर वर्ष  आज्जीचा प्रवास मावळतीकडे सुरु झाला असेल तेव्हा तिला किती प्रकारच्या आठवणीनी छळले असेल? शंभर वर्ष्याच्या आठवणी, केवढा मोठा तो क्यान्व्हास . तिचे ते १९२० च्या आसपासचे बालपण, तरुणपण तिला त्रास देत असेल का? तिला तीन महिन्यापूर्वी भेटायला गेलो होतो, तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणालो "आई मी इकासाय" तिने माझ्या हाताला हात लावला आणि तिच्या डोळ्यात पाणी आले. तेवढ्यात चुलती म्हणाली " रडायला काय होतंय आत्याला कुणास ठावूक? " पण मला त्या भावना समजल्या असाव्यात बहुतेक.

लग्न, नवरा, संसार, सहा लेकरे, नातवंडं, पत्रुंडं…… आणि शंभर पावसाळे. प्रत्येक पावसाळ्यातला वेगळा आनंद आणि वेगळ्या आठवणी. प्रत्येक सुगिने दिलेले भरभरून सुख आणि लेकरांच्या चेहऱ्यावरचे समाधान. मी आज्जीच्या मृत्यू पूर्वीच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत आहे. हो मनाचा ठाव, शक्य आहे का ते ?

तसा आठवणीना काहीच अर्थ नसावा. त्या फक्त सम्भाळाव्यात. तेच क्षण पुन्हा जमा करण्याचे प्रयत्न फसवे आणि अर्थहीन असतात. ते अशक्यच. वर्तमानात जगून भविष्याचा वेध वगैरे घ्यावा, ते ठीकाय पण कश्याला कश्याचा तरी वेध घ्यायचा हा एक मोठाच प्रश्नाय. म्हणजे आयुष्यात काही तरी मोठे करावे वगैरे वगैरे. सगळं भंकसाय. करोडो आले करोडो गेले आयुष्यात मोठे करणारे किती होते ? आणि मोठे करून काय मिळविले. गेलं कि संपलं. साधे तत्वज्ञान. सब माया है. किती वर्ष जगलो, आणि काय काय भोगलं सगळं खोटय साफ खोटं. जिथं वेळ हि संज्ञाच सापेक्ष आहे तिथे वर्ष मोजण्याला काही अर्थ आहे का?

आणि रुढ अर्थाने शंभर वर्ष जगून सुद्धा अजून जास्त जगण्याची आणि श्रुष्टी पाहण्याची नैसर्गिक मानवी इछ्या. माणसाचे जगणे शंभर वर्ष असेल किंवा दहा वर्ष असेल याला काहीच अर्थ नसावा. जायचे तर आज पण उद्या पण किंवा कधी पण.  आणि ह्या आफाट ब्रह्मांडात आणि  त्याच्या आयुष्यात आपले जगणे/अस्तित्व  म्हणजे किती शुद्र? अर्थहीन.




Friday, November 22, 2013

माझा पहिला इमाइन प्रवास


आपल्यावरच्या भयानक तथा बाक्या प्रसंगाला कोण जर हासत असेल किंवा आपली कीव करत असेल तर आपण परत त्याची कीव करून बदला घेवू शकत नाही हा सुद्धा एका भयंकर दुखाचाच प्रकार आहे. उलट आपण खूपच शुद्र आणि ह्या अतिजागतिक जगात अतोनात मागास असल्याची भावना मनात येते. हि भावना जो मनातच ठेवतो तोच खरा शूर माणूस.

तर अश्याच एका अंमंगळ समयी आमच्या साहेबांच्या अति व्यक्तिगत सहकाऱ्याने बोलावून हातात विमानाचे टिकेट कोंबले आणि गोऱ्या साहेबाबरोबर चेन्नैला बैठकीला जावून ये असा आदेश वजा विनंती केली. आम्हाला लगेचच बारक्यापनी शाळेच्या मैदानाहून (चुकुन माकून शाळेत असेल तर ) किंवा रानातून आकाश्यात "आदिक " चिन्हासारखे विमान बघून उड्या मारणारे आम्ही आणि हातातील खुरपी, कुळव बाजूला ठिवून उभं राहून विमानाकडं नजरेआड होत नाही तोवर बघणाऱ्या  अन चर्चा करणाऱ्या रानातल्या आयाबाया अन गडी माणसं आठवली. ह्या अश्या चर्चा ऐकायला आम्ही बारकी चीरकी पोरं कायम घोड्यावर बसून असू.

व्हय, मला म्हाईत हाय, शरद पवारच हाय, रातच्या सातच्या बातम्यात सांगत व्हती बाय!

ईई बाई, वनसंला तर सगळंच माहित असतं. आमच्यात बी हाय मनावं रेडिव.

वच्छला वैनीचं खरं असंल बाई, तीकुनाय तिकडं खाल्लाकड सोलापुरा कडंच चाल्लय नव्ह का इमायीन. वरल्या वाड्यातल्या आपल्या संगुची मावळण न्हाय का सोलापूरचीती सांगत व्हती कि त्यांच्या घराजवळच हाय इमान्तळ.

ह्या बाया मान्सास्नी आक्लीचा पत्या नसतो हि काय खोटं न्हाय सांगितलं संत लोकांनी, च्यामायला, मुण्ढ्या हाय ती, संगर्ष यात्रा चालू न्हाय काय, उद्याच्याला सोलापूरला सबा हाय. लागा उगं कामाला. निस्तं बोलायला फायचेल.

तर अश्या आठवणी बाजूला ठेवून प्रवासाची तयारी केली.

साहेब मला पूर्णपणे ओळखून असल्यामुळे विमातळावर सोडवायला आले. (आमचे इग्रजी मधील संभाषण मराठीत ).

हं तर हे काय अवगढ काम नस्तेय, विकास, नुसते तिकिट दाखवायचे आणि हात वरी करायचे? ते आत सोडतात. आत जावून बसायचे आणि आपल्या विमानाची वाट बघायची आणि आलं कि वळीनं जावून विमानात बसायचं. येस्टित आणि यात कायच फरक नाही हे फक्त हवेतून उडतं एसटी जमिनीवरून.

अन हो लक्ष्यात ठेव, त्यांच्याशी जास्त बोलायचे नाही, तू पण खूप सिनियर आहे असे दाखवायचे, एक किंवा दोनच पेग घ्यायचे, नाहीतर असे कर बियरच घे. सकाळी नाष्टा करताना अगोदर जूस प्यायचा, नंतर थोडे थोडे पदार्थ घ्यायचे बशीत, एकदम भरून घ्यायची नाही प्लेट. खूप खा पण कमी कमी घेवून खा. जेवण झाल्यावर अजून जूस पी. "दोनच पेग घे" हे साहेबांनी मला चार वेळा सांगितले. कुणीतरी साहेबाचे कान भरलेले दिसतात.

तर अखेर प्रसंग आलाच. अश्या वेळी आपण एकदम नवाट खोण्ड असल्याचा अभिनय करावा किंवा एकदम अनुभवी. मधल्या माणसाचे लय हाल होतात हे मला माहितायविमानात शिरताना कावरेबावरे झाले नसल्याचा आणि मी नेहमीच विमानाने प्रवास करतो असा अभिनय करत आपला नंबर बघितला आणि खास या प्रवासासाठी घेतलेली दोन हजार रुपयाची स्याक वरच्या कप्प्यात ठेवली. बेल्ट बांधायचे टेन्शन दुपारपासून व्हतं पण ते इंग्रजी पिच्चर बघायची सवय असल्यामुळे लगीच जमलं. तरी पण शेजारच्या अति प्रोफेशनल बायीने बघितलेच माझ्याकडे. मी आपलं तिच्या हाताला माझा हात लागू नये म्हणून सरकून बसलो तर ती जास्तच आत शिरली. अगोदरच अवघडलेला मी जास्तच अवघडून गेलो

तेवढ्यात खिडकीतून बाहेर बघितले तर लाम्ब् सडक डाव्या पंख्यावरचा पत्रा थोडा तुटल्यासारखा दिसत होता. नेहमी बसणार्यांना काय होत नाहीकवा बवा विमानात बसनार्याचेच अक्सिडेण्ट होतात हे मी आइकले होते. पण नुकतेच शिव खेडाचे ट्रेनिंग करून आले असल्यामुळे "positive thinking" करून मी बाहेरून  लक्ष्य आत आणले. तर माझ्या पुढ्यातच एक भलतीच सुंदर, भुवया चंद्रकोरीप्रमाणे कोरलेली, केसाचा बुचडा गोल करून डोक्यावर ठेवलेला आणि त्याच्यावर जाळी टाकलेली,  मांडीच्या खालचे पाय उघडे असलेली आणि गरज नसताना चेहऱ्यावर मलम लावलेली हवाई सुंदरी हातवारे करीत काही तरी सांगत व्हती.

"हे विमान आहे, अपघात समयी तुमच्या सीटखाली पिशवी आहे ती घ्या आणि इथून एक दरवाजा उघडेल तिथून उडी मारा, श्वास घ्यायला तरास होत असेल तर खालचा मास्क घाला, घाबरू नका" घाबरू नका म्हणून मला तिने किती घाबरविले होते हे तिला काय माहित?

येवढे ऐकून मी शेजारच्या बाईला विचारलेच "काय हो विमानात काय बिघाड आहे का ? ती पोरगी असे का सांगत होती ? "

तिने माझ्याकडे पुन्हा "कहां कहां  से जाते है" या नजरेतून बघितलेच, पण आता आपल्यालाला इज्जतीची काळजी नव्हती तर जीवाची होती.

first time?

No, no, I always travel by plane!

actually, असे प्रत्येक ट्रीप च्या वेळी सांगण्याची पद्धत असते. काळजी करू नकोस. असे म्हणून त्या बाईने  पुन्हा हातातल्या इंग्रजी साप्तहिकातल्या अर्ध्या कपडतल्या बायका बघायला चालू केले. आणि आम्ही पुन्हा विमानाच्या तुटलेल्या पंख्याच्या चिंतेत. हे ऐकून मी भलतेच ओशाळलो होतो. एकतर अशी फिरंग दिसणारी बाई एकदम शुद्ध मराठी बोलत होती आणि आपण ज्याम उघडे पडलो होतो

माणसानं थोडं धट आसलं पाहिजे म्हणून सगळी भीती दाबून खिडकीतून बाहेर बघत बसलो. विमानाने पळायला चालू केले आणि तो पंख्यावरचा पत्त्रा आता खूपच हालायला लागला. तिथे लाल लाईट पण लागली होती. विमानाने उडी घेतली आणि एकदम वाकडे होवून तिरके पळू लागले. म्हणलं आई घातली आता, विमान तिरकं होवून एकाच अंगाडावर चालू लागलंय. माझं भूयारच तंग.  बरं आपण अगोदरच सगळ्या गावात नास्तिक असल्याचा आव आणत असल्यामुळे आणि पुरोगामी होण्याच्या छंदामुळे आता खरंच नास्तिक असल्यासारखं वाटु लागलं व्हतं. त्यामुळं देवाचं नाव घेण्याचा सोपा पर्याय आम्ही कटाप केला होता याचे खूपच दुक्ख झाले. आठ वर्षात पहिल्यांदा नास्तिक असल्याचा पश्चातापा होत होता. बायको,  पोरं, आई बाप, गाव , शेत, चावडी कसे सगळे समोर दिसू लागलं. तेवढ्यात विमान सरळ झालं आणि आकाशात उडू लागलं. जोपर्यंत " आता चेन्नैत पोचलो आहोत आणि बाहेरचे तापमान एकोणतीस डिग्री आहे असे ऐकल्यावर जीवात जीव आला".  हे लोक तापमान फिपमान कश्याला सांगतात कुणास ठावूक?

दुसऱ्या दिवशी घरून सकाळी आठ वाजता फोन -

जेवला कारं बापू?
होय जेवलो
कुठाय हापिसात पोचला का घरीच हाय अजून?
नाही मी मद्रासला आलोय काल, विमानाने
इमानानं? आगं माय गं माझं सोनं इमानानं फिरतंय गं ! ती मला मनंतच व्हतं बग, आपलं पोरगं इमानानं फिरणार एक दिस. तरीच काल दुपारी आपल्या रानातनं एक इमाईन दिसलं व्हतं त्यातच असशील बाग तू! म्या बरोबर वळ्कुन ह्यांना मनलंच व्हतं. तर त्यांनी म्हणत्यात तुला तर काय डोक्याचा भागच न्हाय!