Wednesday, September 11, 2013

"विसाव्या शतकातील मराठी साहित्य

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही दशकामध्ये मराठी साहित्याला ग्लानी आली होती. सुमारे आठशे वर्षा नंतर सुद्धा मराठी साहित्य संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या प्रभावातून मुक्त होवू शकले नव्हते. तरी सुद्धा संत ज्ञानेश्वर हे मुळचे मराठीच असावेत कि नाहीत ह्यावर अनेक संशोधकांचे एकमत झालेले नाही. पद्य हा प्रकार कठिन आणि न समजणारा समजला जात होता.  त्यामुळे लोक गद्द्याकडे वळल्याचे निराशादायक चित्र तयार झाले होते. हा मराठी साहित्यातला काळा कालखंड असावा.  पद्याला फेसबुक ह्या माध्यमाद्वारे खूपच भयंकर आणि कडव्या टिकेला सामोरे जावे लागत असल्यामुळे कवी लोक कविता करायला धजत नसावेत असे पण काही इतिहासकार आणि साहित्य तज्ञांचे मत आहे. तर आता हे फेसबुक काय होते? तर यावर संशोधन चालू आहे. महामहीम मार्तंडेशंकर गिरिधारी यांच्या मते फेसबुक हे त्या काळच्या विरोधी पक्षांनी एकत्र येवून सरकारला शिव्या देण्यासाठी तयार केलेले मध्यम असावे. तर आता विरोधी पक्ष्य आणि सरकार ह्या काय भानगडी होत्या ह्यावर पण संशोधन चालू आहे.  काही संशोधकांच्या मते त्याकाळी दोन जाती असाव्यात एक सरकार आणि दुसरी विरोधक. ह्या दोन जातीतील वैरामुळे खूप मनुष्यहानी झाल्याची पण खूप उदाहरणे आहेत. पण ह्या फेसबुक नामक दुधारी तलवारीचा वापर तत्कालीन होतकरू साहित्यिक आणि शीघ्र कवी आपली साहित्ये प्रसवण्यासाठीच जास्त करत असावेत असेही अलिकडेच पुणे नामक जमिनीखाली गाडल्या  गेलेल्या शहरातील उत्खननात आढळलेल्या संगणक सदृश्य पदार्थात सापडलेल्या माहितीवरून समजून येते.

महामहीम मार्तंडेशंकर गिरिधारी यांचा असाही दावा आहे कि तत्कालीन मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवी श्रीमान ग्रेस, श्रीमान मर्ढेकर, श्रीमान वी. वा. शिरवाडकर ह्यांनी व अश्या अनेकानी अनेक तर्हेच्या न उमजणाऱ्या तसेच प्रेमाच्या, निसर्गाच्या, वीर रसाच्या कविता लिहून मराठी साहित्यात कोंडी निर्माण केलेल्या संत साहित्याच्या भिंतीवर धडका देवून साहित्याला मोकळी वाट करून देण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. विद्रोह नामक नवीनच संकल्पना या काळात उदयाला आलेली पण दिसते पण त्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही.

पण खऱ्या अर्थाने मराठी साहित्यामध्ये रेनासंस आणण्याचे श्रेय द्यावे लागेल ते संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी या प्रख्यात कवींना.  शेतामध्ये, रणांगणावर, घरात आणि संसारात अडकलेले मराठी काव्य लोकल मध्ये, ऒफ़िस मध्ये घेवून जाण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांच्यामुळेच मुलीना आणि मुलांना बाप सुद्धा आपल्यावर प्रेम करतो हे समजून आले. त्यांच्या पश्चात त्यांचे साहित्य एक हजार वर्षा नंतर जगातील सर्व प्रमुख म्हणजेच  मराठीच्या आक्रमणामुळे ज्या पाच पंचेवीस भाषा उरल्या आहेत त्या भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे.  जगातील हजारो विश्वविद्यालयामध्ये अजूनही त्यांचे काव्य शिकविले जाते हाच आहे पुरावा त्याच्या वैश्विकतेचा आणि चिरंतनतेचा. आज जगातला कोणताच असा प्रदेश नाही कि तिथे यांच्या काव्याची पारायणे बसविली जात नाहीत. मराठीच नाही तर जागतिक स्तरावर तयार झालेली साहित्यिक कोंडी फोडून मराठी साहित्याला जगातील साहित्याचा मैलाचा दगड बनवण्याचा माण मिळवून दिल्याबद्दल आणि चांद्या पासून बांद्या मार्गे निव जर्सी पर्यंत पोहोचलेले मराठी विश्व कायमच संत संदीप आणि संत सलिल याचा आभारी राहील व अभिमान पण बाळगेल.

कुमार : दिग्विजयसिंग पांडे आणि मार्टिन केस्तोवोस्की , यांच्या "विसाव्या शतकातील मराठी साहित्य" ह्या शोध निबंधातून.
निव जर्सी 
सन ३१२९



No comments:

Post a Comment