Wednesday, April 2, 2014

गुडीपाडवा

तिसरी पर्यंत गावातच होतो. गावात कोणत्याच सणाचे कौतुक नसायचे. अगदी दिवाळीला सुद्धा सकाळपर्यंतच सगळं उरकून दुपारी भाकरी बांधून रानात जाणारेच बहुतेक लोक. अभ्यंग स्नान वैगेरे मध्यमवर्गीय गोष्टी त्यावेळी फक्त ब्राह्मण लोकांना किंवा मोठ्या जमीनदार लोकांनाच परवडायच्या किंवा त्याचे कौतुक असायचे. बाकीच्यांच्या दिवाळीची उडी प्रकाशच्या माक्याच्या तेलापर्यंत पोचली तरी मोठी गोष्ट. 

आज टीव्हीवर डोंबिवलीत, गोरेगावला निघालेल्या मिरवणुका पाहिल्या आणि ह्या सणासुदीचे कौतुक फक्त शहरी मध्यम वर्गीयानाच असते याची तीवृ जाणीव झाली. चौथीपासून मी पण स्वताला मध्यमवर्गीय वैगेरे समजू लागलो होतो. कारण वडील सहकारी साखर कारखान्यात का हुना पण नोकरीला लागले होते. त्यामुळे महिन्याला काही पैसे हमखास मिळणारे लोक म्हणजे मध्यम वर्गीय या संज्ञेत मी आमच्या कुटुंबाला बसवायला चालू केले होते. गुडी पाडव्याची सकाळची लगबग चालू व्हायची आणि माझा वडिलांच्या मागे तगादा असायचा कि आपलीच गुडी सर्वात उंच पाहिजे. झालं मग चांगलिचुंगली कापडं घालून गुडी उभारली कि कडुलिंबाच्या दोनचार बिया गुळाबरोबर खायच्या आणि साखरेचे हार वाटायला चालू व्हायचे. आपल्या सलगीतल्या लोकांच्या घरी जावून त्याना हार देणे. ज्यांच्याकडून आपले काही तरी काम आहे किंवा स्वार्थ असेल तर त्यांच्या घरी खोबऱ्याचा हार द्यायचा. दुपारी येळवण्याची आमटी, पुरण पोळी आणि भात वर्पून हाणायचा. तोंडी लावायला वेगवेगळ्या धान्याच्या पिठापासून केलेल्या भातुड्या, पापड्या कुरवड्या इत्यादी. संध्याकाळी संपला सन. हे का करतोय, कश्यामुळे करतोय याच्याशी कुणाला देणेघेणे असलेले मला दिसले नाही. पण आनंद उत्सव साजरा तेव्हा पण होत होता आणि आज पण होतोय. थोडेफार स्वरूप बदलले असेल.

थोडंसं मोठं झाल्यावर कळले कि गुडीपाडवा हा सण का साजरा करतोय याच्यासाठी प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या थेऱ्या आहेत. कोणत्या थेरीला खरे मानावे किंवा नाकारावे आपला तेवढा अभ्यास नाही. पण मित्रानो कालच्याच दिवशी संभाजी महाराजांची क्रूर पणे हत्या करण्यात आली होती ते दुःख तो राग मनात असतान तुमच्या शुभेछ्या कोणत्या भावनेने स्वीकारू ? किंवा कोणत्या भावनेने तुमच्या आनंदात सहभागी होवू ?

एंगेजमेन्ट

महाराष्ट्रात "एंगेजमेन्ट" हा प्रकार कधीपासून चालू झाला हा प्रश्न भारतात आर्य कधी आले वा खरेच आले कि नाहीत या प्रश्ना इतकाच कठीण आहे. काही दिवसापूर्वी सुपारी फोडणे, साखर पुढा, टिळा ह्या गोष्टी प्रचलित होत्या. त्याची जागा आता अंगठी ह्या दागिन्याच्या खदलाबदलीने घेतली आहे. जुन्या काळी किंवा अजूनही गावाकडे, बैठकीतला जाणता माणूस नाहीतर मुलीचा मामा एकावर एक पाच किंवा आकरा सुपाऱ्या ठेवून हाताच्या एका दणक्यात फोडायचा आणि लग्न ठरायचे. मंग लोकाच्या अंगावर गुलाबी रंग टाकून लग्न जमले हे घोषित करायचे आणि साखर वाटायचे. जेवायला बेत मस्त वांग्या बटाट्याची इसूर घालून केलेई कडक सरबरीत भाजी, फोडणीचा वटाणे वैगेरे टाकून केलेला चमचमीत भात आणि चपाती वर ताव मारून आपापल्या गावाला मंडळी रवाना. बुंदी लग्नात असते. बैठकीला गेलेल्या माणसाच्या अंगावर गुलाबी रंग दिसला कि जमलं म्हणायचे लग्न.

परवा एका कोर्पोरेट मराठी मित्राच्या "एंगेजमेंट" ला जाण्याचा योग आला. स्टार वजा हॉटेल मध्ये वोळिने ठेवलेल्या खुर्च्यावर आपली इज्जत जावू नये म्हणून शांत बसलेली किंवा हळु बोलत असलेली गडी आणि बाया माणसं. वातानुकुलीत यंत्रणा छ्यान चालू. कुणाला काय बोलावे ते समजत नाही. समोरील स्टेजवर आदिवासी भागातून आलेला आणि पुणेरी टोपी घालून बसलेला गोरा गोमटा कॉर्पोरेट दोस्त. आणि त्याच्याकडेने गोळा झालेले त्याचे दोस्त. आपली पण इज्जत जावू नये म्हणून मी पण आवाज न करताच घुसलो आणि म्हणालो "hi dear" तर त्याने मला वोढून घेतले आणि वोळख करून दिली

"hey guys, this is my friend Vikas, he is writer"
सभ्य घोळक्यातून आवाज " oh really , how many books have you published? "
मी अभिमानाने, " मी फेसबुक्या आहे "
हे माझे उत्तर एवढे काम करीन वाटले नव्हते पण बऱ्याच लोकांनी इज्जतीला न घाबरता मराठीती बोलायला चालू केले.

तेवढ्यात गुरुजी आले, पुण्यात गुरुजी म्हणतात. आणि वागदत्त वधु आणि वराने एकमेकांना अंगठी घातली आणि साखरपुडा आपलं एंगेजमेंट संपली.
माझ्या मित्रासाठी ती अंगठी मंगळ सूत्राचं काम करणार म्हणे. तेवढ्यात माझं पोरगं "बाबा जेवायला कधीय, जेवायला कधीय हे सगळ्या समोर मोठ्याने बोंबलत होतं, त्याला घेवून डायनिंग हॉल मध्ये गेलो. फार अपेक्षा नाव्हती पण जेवावे तर लागणारच होते. सपकसूळ पनीरची आमटी, तसाच सेम कोप्ता, पातळ वरण (दाल तडका) आणि भगुण्यात ठेवलेल्या जाडजूड पंजाबी रोट्या. गावाकडल्या पतरवाळीवर घेतलेल्या चमचमीत भाताची आणि भाजीची आठवण काढीत जीरा राईस आणि कोप्त्याची आमटी खावून निघालो.

कुणाच्याच अंगावर गुलाबी रंग दिसत नव्हता.